कल्याण : कल्याण पश्चिमेत दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. या सततच्या वाहन कोंडीने प्रवासी हैराण आहेत. सोमवारी दुपारी कल्याण पश्चिमेतील रेल्वे स्थानक ते शहाड रेल्वे स्थानक भागातील रस्ते, चौक वाहन कोंडीने गजबजून गेले होते.

कल्याण पश्चिम वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी, वाहतूक सेवक यांचे नियोजन नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे अशा तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येत आहेत. कल्याण पश्चिमेत रेल्वे स्थानक आणि मुख्य चौक वगळता इतर भागात वाहतूक पोलीस, सेवक रस्त्यावर दिसत नसल्याच्या तक्रारी प्रवासी करत आहेत. अधिक माहितीसाठी कल्याण वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधला, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
कल्याणमधील मुरबाड रस्ता, रामबाग, शहाड, गणेशघाट, मुरबाड रस्त्यालगतचे अंतर्गत रस्ते कोंडीने गजबजले होते. त्यामुळे कल्याण शहराबाहेर येणारी वाहने जागोजागी अडकून पडली होती. मुरबाड, उल्हासनगर दिशेने येणारी वाहने उड्डाण पुलांवर खोळंबून होती. दुपारच्या वेळेत वाहन कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस नसल्याने वाहन चालक मनमानी पध्दतीने वाहने पुढे दामटून कोंडीत आणखी भर घालत होते. शालेय बस, मालवाहतूकदार यांना या कोंडीचा फटका बसला.

हेही वाचा…कल्याणमध्ये तरूणींना वेश्या व्यवसायात आणून पैसे कमविणारी महिला अटकेत

नगर, मुरबाडकडून येणाऱ्या मुंबई, रायगड भागात जाणाऱ्या बस या कोडीत अडकल्या होत्या. कल्याण शहरात वाहन कोंडीचा विषय गंभीर होऊनही वाहतूक पोलीस, पालिका प्रशासन ठोस उपाययोजना करत नसल्याने प्रवासी संताप व्यक्त करत आहेत. सकाळी कामावर जाणारे आणि परतणारे नोकरदार या कोंडीने सर्वाधिक त्रस्त आहेत. या सततच्या कोंडीमुळे एक दिवस प्रवाशांचा उद्रेक होईल, असा इशारा प्रवाशांकडून देण्यात आला आहे.