ठाणे : ठाणे आणि मुंबई-अहमदबाद मार्गांना जोडणाऱ्या घोडबंदर मार्गिकेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. कोंडी टाळण्यासाठी या मार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली असली तरीही रविवारी या वाहनांची वाहतूक सुरूच होती. त्यामुळे घोडबंदर मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अवघे एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी दोन तासांपेक्षा अधिक वेळ लागला. त्यामुळे चालकांकडून संताप व्यक्त केला जात होता.

अवजड वाहनांना बंदी असतानाही प्रवेश कसा दिला जातो, असा प्रश्न वाहन चालक विचारत आहेत. घोडबंदर मार्गावर पावसाळ्यात खड्डे पडत असतात. त्यामुळे येथील घाट रस्त्याच्या तात्पुरत्या स्वरूपात डागडुजीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात आहेत. घोडबंदर मार्ग हा ठाणे तसेच मुंबई अहमदाबाद मार्गाला जोडतो. उरण येथील जेएनपीटी येथून जाणारी हजारो अवजड वाहने घोडबंदरमार्गे वसई किंवा गुजरातच्या दिशेने ये-जा करत असतात.

हेही वाचा >>>जुन्या ठाण्यातील पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक झालेल्या कुटुंबियांची बैठक

राज्य परिवहन मंडळाच्या बसगाड्या (एसटी), महापालिका परिवहन विभागाच्या बसगाड्यांसह हलक्या वाहनांची वाहतूक येथून मोठ्या प्रमाणात होत असते. येथील दुरुस्ती कामामुळे वाहनचालकांना दररोज कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रविवारी घोडबंदर मार्गावर कासार वडवली ते चेना पूलपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. अनेक वाहने एकाच ठिकाणी थांबून होती. दुपारी कडाक्याचे उन्हात कोंडीमुळे दुचाकीस्वारांचे हाल झाले.