टँकरमाफियांकडून पाणीचोरी, वाहनधुलाईचा सपाटा
उल्हास नदीच्या प्रदूषणावरून स्थानिक पालिका प्रशासनाला सर्वोच्च न्यायालयाने तडाखा दिला असला तरी या नदीचे प्रदूषण अद्याप थांबलेले नाही. बदलापूर पश्चिमेतील उल्हास नदीवरील पुलाखाली मोठय़ा प्रमाणावर छोटीमोठी वाहने सर्रासपणे धुतली जात आहेत.
त्यामुळे नदी प्रदूषण सुरूच असून त्यात टँकरमाफियांकडूनही येथील पाण्यावर डल्ला मारला जात आहे. त्यामुळे नदीपात्राच्या स्वच्छतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
उल्हास आणि वालधुनी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. तिथे राज्य सरकारच्या वतीने नदी प्रदूषण रोखून नदी पुनर्जीवनाची हमी देण्यात आली असली तरी कृतीत मात्र अद्याप नदी संरक्षण केले जात नसल्याचेच चित्र आहे. त्यात कुळगाव बदलापूर नगरपालिका, उल्हासनगर महापालिका क्षेत्रातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे नदी प्रदूषण सुरूच आहे. गेल्याच महिन्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने प्रदूषण नियंत्रण मंडळालाही नदीचे पाणी अशुद्ध असल्याचे सांगितले होते. मात्र प्रदूषण रोखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आवश्यक गोष्टी अद्याप न झाल्याने प्रदूषण सुरूच आहे. त्यात बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्रात प्रदूषण थांबलेले नाही. पूर्वी शासकीय धोरणलकव्यामुळे होत असलेले प्रदूषण आता नागरिकांच्या अतिउत्साहामुळे होत असल्याचेच समोर आले आहे. बदलापूर पश्चिमेतील चौपाटीशेजारी असलेल्या पुलाखाली गेल्या काही दिवसांपासून छोटी आणि मोठी वाहने, दुचाकी, ट्रक, टेम्पो, रिक्षा धुण्याचे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. त्यामुळे वाहनांचे तेल आणि इतर साहित्यामुळे नदी प्रदूषणात भर पडते आहे. शनिवार, रविवारी तर येथे धुण्यासाठी वाहनांची रांगच लागलेली असते. टॅँकरमाफियांनीही नदीच्या पाण्यावर डल्ला मारण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळा संपताच सुरू झालेल्या बांधकामाच्या हंगामाला या पाण्याची मोठी मदत होत असते. त्यामुळे उल्हास नदीपात्र, ढोके दापिवलीशेजारून वाहणारी बारवी नदी या भागातून मोठी पाणीचोरी होत आहे.