कल्याण – आपल्या बहिणीबरोबर का बोलतोस, असा प्रश्न करून उल्हासनगरमध्ये एका तरुणाने आपल्या दोन मित्रांसह एका तरुणाला लोखंडी सळईने मारहाण केली आहे. या मारहाणीत हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

उल्हासनगर कॅम्प क्रमांक चार येथील शाळा क्रमांंक १४ समोर हा प्रकार घडला आहे. यश विनायक चिल्ले (१९) असे तक्रारदार तरुणाचे नाव आहे. तो उल्हासनगरमधील बुद्ध विहार भीमनगर भागात राहतो. ज्ञानेश्वर गायकवाड उर्फ गुड्य्या, हरेश केदारे, जतिन मोरे अशी आरोपींचे नावे आहेत. जतिन हा सराईत गुन्हेगार आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – बदलापूर प्रकरणातील ‘ती’ रणरागिणी विधानसभेच्या रिंगणात

पोलिसांनी सांगितले, तक्रारदार यश चिल्ले हा आपल्या दुचाकीमध्ये पेट्रोल भरण्यासाठी चालला होता. उल्हासनगर कॅम्प क्रमांक चारजवळील शाळेसमोर त्याची दुचाकी येताच, त्याला आरोपी ज्ञानेश्वर गायकवाड याने अडविले. तु माझ्या बहिणीसोबत का बोलतोस. तिच्याशी तू कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवायचा नाही, असे बोलून ज्ञानेश्वरने तक्रारदार यश चिल्ले याला बेदम मारहाण सुरू केली. त्याला धक्काबुक्की करत खाली पाडण्यात आले.

हेही वाचा – दिव्यामधील महापालिका शाळेतील ४४ विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळेतून देण्यात येणाऱ्या खिचडीत मृत पाल आढळली

यावेळी ज्ञानेश्वरचे साथीदार हरेश, जतिन पुढे आले. त्यांनीही यशला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपींनी लोखंडी सळईचा फटका यशच्या डोक्यात मारून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत यशच्या डोक्याला, हात, पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक अरुण दुबळे याप्रकरणाचा तपास करत आहेत.