लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण : कल्याण डोंबिवली शहरांच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान निधीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८५ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. एवढा निधी उपलब्ध असुनही शहरे स्वच्छ का होत नाहीत. तलावांची स्वच्छता त्यात नाही का, असे प्रश्न केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपील पाटील यांनी नुकताच पालिका अधिकाऱ्यांना करून ८५ कोटी देऊनही येथे स्वच्छतेसाठी पंतप्रधान मोदींनी येऊन झाडू मारायचा का, असा संतप्त सवाल केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी नुकतीच कल्याण मधील ऐतिहासिक काळा तलावाची (भगवा तलाव) पाहणी केली. यावेळी तलाव परिसरात कचरा पडलेला असल्याचे त्यांना दिसून आले. अनेक तरूण रात्रीच्या वेळेत तलाव परिसरात मद्यपान करून मद्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचा कचरा, पिशव्या तेथेच टाकून निघून जातात. सकाळच्या वेळेत काळा तलाव भागात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना या कचऱ्याचा त्रास होतो.

आणखी वाचा-मीरा भाईंदर शहरात १८३ बांधकामे अनधिकृत, प्रशासनाकडून पहिल्यांदाच यादी प्रसिद्ध

अधिकाऱ्यांची कानउघडणी

काळा तलाव परिसरात दररोज कचरा पडलेला असतो. तो पालिकेकडून काढला जात नाही, अशा तक्रारी नागरिकांनी भिवंडी लोकसभेचे खासदार, केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्याकडे केल्या होत्या. मंत्री पाटील यांनी नुकताच सकाळच्या वेळेत कल्याण मधील काळा तलाव भागात पाहणी केली. यावेळी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, घनकचरा विभागाचे उपायुक्त अतुल पाटील उपस्थित होते. काळा तलावासह कल्याण शहराच्या विविध भागातील कचऱ्याच्या प्रश्नावरून केंद्रीय मंत्री पाटील यांनी आयुक्त डाॅ. जाखड यांना शहर नियमित साफ होत नाही. कल्याण मधील विविध भागात नागरिक दररोज समाज माध्यमांवर कचऱ्याची छायाचित्रे टाकून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधतात. एवढी वेळ नागरिकांवर का येते. तलावाची स्वच्छता पालिकेच्या अखत्यारीत येत नाही का, असे प्रश्न पाटील यांनी आयुक्तांना केले.

आणखी वाचा-मुंब्रा बाह्यवळणावरील भूस्खलन रोखण्यासाठी लवकरच सुरक्षा उपाययोजना

स्वच्छतेवर खर्च

पालिका सार्वजनिक स्वच्छतेवर किती खर्च करते, असा प्रश्न मंत्री पाटील यांनी केला. यावेळी आपण पदभार घेतल्यापासून प्राधान्याने सार्वजनिक स्वच्छतेवर लक्ष केंद्रीत केले आहे. सार्वजनिक स्वच्छते संदर्भातील काही प्रकल्प आराखडे अंतीम मंजुरीच्या प्रक्रियेत आहेत. या प्रक्रिया झाल्यावर स्वच्छतेची कामे मार्गी लागतील, असे आयुक्त जाखड यांंनी सांगितले. उपायुक्त पाटील यांनी सहा प्रभागांमधील कचऱा उचलण्याच्या कामासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. स्वच्छ भारत अभियानातून पालिकेला ८५ कोटीचा निधी उपलब्ध झाला आहे, अशी माहिती मंत्री पाटील यांना दिली. एवढे पैसे येऊन त्याचे करता काय. पैसे खायची कामे फक्त करता. कचरा शहरात पडतोच कसा, तुम्हाला त्याचे काही वाटत नाही का. शहरातील नागरिकांबद्दल तुमचे काही दायित्व आहे की नाही, असे संतप्त प्रश्न मंत्री पाटील यांनी केले.

कामगार गैरहजर

स्वच्छता अधिकारी, कामगारांवर करडी नजर ठेवा, असे पाटील यांनी आयुक्तांना सूचित केले. अनेक कामगार कामावर येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याविषयी आपण कठोर धोरण अवलंबले आहे, असे आयुक्त जाखड यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister kapil patils question to the kalyan dombivli municipal officials mrj
Show comments