ठाणे : गुन्ह्यांचा तपास अधिक चांगल्या प्रकारे व्हावा या उद्देशातून गुन्ह्यांच्या तपासासाठी कृत्रिम बुद्धीमतेसह (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देणे तसेच महिला अत्याचार गुन्ह्यांचे आरोपपत्र न्यायालयात वेळेत दाखल करणे, अशा सुचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना ठाण्यात झालेल्या बैठकीत दिल्या. तसेच अमली पदार्थाच्या गुन्ह्यात कोणत्याही पोलिस अधिकाऱ्याचा सहभाग आढळून आला तर त्याला बडतर्फ केले जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. तसेच एखाद्या गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल संबंधित तक्रारदाराला परत करण्याची तरतुद आहे. त्यानुसार सहा महिन्यात हा मुद्देमाल परत केला गेला पाहिजे, अशा सुचनाही त्यांनी दिल्या. या बैठकीत उद्योगांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये यावरही चर्चा झाली.

ठाणे शहरात आयोजित केलेल्या ३५ वी महाराष्ट्र राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी उपस्थिती लावली. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी राज्यातील गुन्हे आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी रेमंड गेस्ट हाऊसमधील कम्युनिटी हॉलमध्ये राज्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी गृहराज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पुणे येथील तरुणावरील लैंगिक अत्याचार प्रकरण, महिला सुरक्षा, बीड येथील सरपंचाची हत्या, राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्थेचे प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर हि विशेष बैठक पार पडली आणि त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सुचना केल्या.

बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली.

राज्यात सायबर गुन्हे रोखण्यासाठी एक मजबूत महासायबर प्लॅटफार्म तयार करण्यात आला असून त्याचे बैठकीत सादरीकरण झाले. महिलांवरचे अत्याचार, बालकांवरचे अत्याचार अशा गुन्ह्यांचे अतिशय कमी वेळेत आरोपपत्र कसे जाईल, यावर चर्चा झाली. उद्योगांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये या दृष्टीने काय करता येईल, यावरही चर्चा झाली. अमली पदार्थाबाबत शुन्य सहनशीलता धोरण राबविले जात आहे. केंद्र सरकारने जो नवीन कायदा तयार केला आहे. त्यात शक्ती कायद्यातील अनेक गोष्टी अंतर्भुत केल्या आहेत. त्यांचा पुन्हा आढावा घ्यावा लागेल. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

देशमुख प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षेसाठी प्रयत्न

संतोष देशमुख हत्या प्रकरणी पोलिस सुरवातीपासून कठोर तपास करीत आहेत. संपूर्ण पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. उज्वल निकम यांना नेमले आहे. त्यामुळे आरोपींना कठोरता कठोर शिक्षा मिळावी असा प्रयत्न राहणार आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र पोलिस देशात सर्वोत्तम

महाराष्ट्र पोलिस देशात सर्वोत्तम २०२३ मध्ये झालेल्या या स्पर्धेत २५८८ खेळाडूंचा सहभाग होता, २०२४ मध्ये ३५०० आणि आता २९२९ खेळाडूंचा सहभाग आहे. ही संख्या कमी झाल्याबाबत खंत व्यक्त करत यापुढे ही संख्या अधिक कशी वाढेल, यासाठी प्रयत्न करावेत. पोलिस दलात चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे २०२६ मध्ये ज्यावेळी भारतात ऑलम्पिक स्पर्धेत पोलीस दलातील खेळाडूंचा समावेश व्हावा, यासाठी प्रयत्न करावेत, अशा सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना केल्या. राज्याचे पोलीस दल हे देशातला सर्वोत्तम पोलीस दल झाले आहे. या पोलिस दलाने महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखत महाराष्ट्राला औद्योगिकदृष्ट्या नंबर एक राज्य केले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Story img Loader