ठाणे : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील एका गोदामात मतदान ओळखपत्रांसह भंगार अवस्थेत मतदान यंत्रे सापडल्याने खळबळ उडाली आहे. मतदान यंत्रे आणि ओळखपत्रे इथे कशासाठी ठेवण्यात आली होती आणि त्याकडे निवडणुक विभागाचे इतके दिवस लक्ष कसे गेले नाही, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा मतदान यंत्रणाचा घोटाळा असल्याचा आरोप करत निवडणुकीत मतदान यंत्रे बदलली जात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, या गोदामातील साहित्याचा व सध्याच्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा काहीही संबंध नसल्याचे जिल्हा निवडणुक विभागाने स्पष्ट केले आहे. ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी येत्या २० मे रोजी मतदान होणार असून या निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. महाविकास आघाडीतर्फे खासदार राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. तर, महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केला नसला तरी महायुतीच्या नेत्यांनी मोदींच्या नावाने प्रचार सुरू केला आहे. या मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. शिवाय, हा मतदारसंघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात येत असल्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. अशातच ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील एका गोदामात हजारो मतदान ओळखपत्रांसह भंगार अवस्थेत मतदान यंत्रे सापडली असून या संबंधीचा चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हेही वाचा- भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील आसन व्यवस्थेखालील जागेत खोल्या आहेत. त्यातील एका खोलीत निवडणूक आयोगाने २०१४ पासून काही वस्तु ठेवल्या होत्या. त्याकडे कोणाचेही लक्ष नव्हते. गुरुवारी अचानक आठवण झाल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी तलाठी, पोलीस, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ही खोली उघडण्याचा प्रयत्न केला. अर्धवट तुटलेल्या दरवाजाला लावलेले कुलूप चावीने उघडण्याचा प्रयत्न करूनही ते उघडले जात नव्हते. अखेर कुलूप दगडाने तोडून दरवाजा उघडण्यात आला. या खोलीत प्रवेश केल्यानंतर आतमध्ये विजेची व्यवस्था नसल्याचे आढळून आले. शिवाय, या खोलीत अनेक पेट्या सापडल्या. गंज लागलेल्या या पेट्यांमध्ये बंद लिफाफे, मतदान ओळखपत्र आणि भंगार अवस्थेत मतदान यंत्रे सापडली. या सर्व वस्तू भंगारात विकण्याचे आदेश देण्यात आले असून ठाणे महापालिकेने २०१४ मध्ये ही खोली निवडणूक आयोगाला गोदाम म्हणून वापरण्यास दिली होती. मात्र, त्यानंतर ही खोली उघडण्यातच आली नव्हती. ही ओळखपत्र नेमकी कुणाची आहेत आणि इथे कशासाठी ठेवण्यात आली होती. तसेच मतदान यंत्रेही इथे कशासाठी ठेवण्यात आली होती आणि ती भंगार होईपर्यंत यंत्रणेचे त्याकडे लक्ष कसे गेले नाही, याविषयी अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. जितेंद्र आव्हाडांचा आरोप ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील एका खोलीत मतदान यंत्रे सापडले. ठाणे जिल्ह्यात शंभर मतदान यंत्र आली असतील तर, ती जिल्हाधिकारी किंवा निवडणुक अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली जातात. मग हे यंत्र इथे कसे राहिले. हा मतदान यंत्रणाचा घोटाळा आहे. मतदान यंत्र बदलली जातात ही मनात सशंकता आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत होता तर, दुसरीकडे मतदान यंत्रे आढळतात. मी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी फार सहमत आहे, असे नाही. मला माझे मत कुठे गेले हे कळलच पाहिजे, माझ्या मनात शंका का राहावी. मी माझे मत कोणाला दिले आहे ते मला कळलेच नाही तर माझ्या मनात संशय राहणारच, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. हेही वाचा - इंडिकेटर यंत्रणेतील गोंधळामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकात महिला लोकलमधून पडली ठाण्यातील दादोजी कोंडदेव क्रीडाप्रेक्षागृहातील गोदामात सापडलेल्या निवडणूक विषयक साहित्यासंदर्भात वस्तुस्थितीदर्शक माहिती दिली आहे. या गोदामातील साहित्याचा व सध्याच्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेचा काहीही संबंध नाही. - अशोक शिनगारे, ठाणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी