बदलापूरः अंबरनाथ आणि बदलापूर शहरात पाणी पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जुलै महिन्यापासून पाण्याचा दरात १० टक्क्यांची दरवाढ करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र याबाबत विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना ही दरवाढ केली जाणार नसल्याची घोषणा पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हेही वाचा >>> एनसीसी ट्रेनिंगच्या नावाखाली विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, घटनेचा VIDEO व्हायरल प्रति हजार लीटर पाण्यासाठी घरगुती ग्राहकांना १३.३० रूपयांऐवजी १४.६३ रूपये मोजावे लागत होते. ठाणे जिल्ह्यातील वेगाने वाढणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर आहे. मात्र यंदाच्या वर्षात जुलै महिन्यापासून जीवन प्राधिकरणाने पाणी पुरवठ्याचे दर १० टक्क्यांनी वाढवले होते. ही दरवाढ १ जुलैपासून लागू करण्यात आली होती. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील नागरिकांचे पाणी महागले होते. अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील घरगुती ग्राहकांना प्रति हजार लीटर पाण्यासाठी १३ रूपये ३० पैशांऐवजी १४ रूपये ६३ पैसे मोजावे लागत होते. तर १५ हजार ते २५ हजार लीटर पाणी वापर केल्यास २० रूपये ६० पैशांऐवजी २२ रूपये ६६ पैसे मोजावे लागत होते. या दरवाढीमुळे घरगुती ग्राहक आणि गृहसंकुलांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता होती. हेही वाचा >>> ठाणे पालिकेतील साहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या याबाबत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी गुरूवारी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात शहरातील पाणी पुरवठ्याच्या संदर्भात लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीवर बोलताना राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही १० टक्क्यांची दरवाढ केली जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. घरगुती ग्राहकांसह वाणिज्य नळजोडणी असलेल्या आणि शासकीय संस्था तसेच आयुध निर्माण संस्थेला सोसावी लागणारी दरवाढही मागे घेतली जाणार असल्याने त्यांनाही दिलासा मिळणार आहे.