लोकसत्ता खास प्रतिनिधी
कल्याण: कल्याण शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बारावे येथील जलशुध्दिकरण केंद्रात येत्या मंगळवारी यांत्रिक आणि विद्युत देखभालीचे काम करायचे आहे. त्यामुळे मंगळवारी (ता. ८) सकाळी आठ ते रात्री आठ वेळेत कल्याण पूर्व, पश्चिम भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, असे कल्याण डोंबिवली पालिकेचे यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पवार यांनी सांगितले.
गेल्या महिनाभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जलशुध्दिकरण केंद्रात देखभाल, दुरुस्तीची कामे पालिकेला करता आली नाहीत. पावसाने उघडिप दिल्याने यांत्रिकी विभागाने बारावे जलशुध्दिकरण केंद्रात मंगळवारी यांत्रिकी आणि विद्युत देखभाल, दुरुस्ती करण्याचे नियोजन केले आहे.
मंगळवारी पाणी पुरवठा दिवसभरात नऊ तास बंद राहणार आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सांभाळून पाणी वापरावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे.