जयेश सामंत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील ऐतिहासीक बंडाच्या महिनाभर आधी प्रदर्शित झालेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटाला मिळालेल्या मोठया प्रतिसादानंतर मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने याच श्रृखंलेतील धर्मवीर-२ या चित्रपटाचा मुहूर्त ठाण्यातील कोलशेत भागात सोमवारी थाटामाटात करण्यात आला. एका चित्रपटाचा मुहूर्त इतकेच या कार्यक्रमाचे स्वरुप असले तरी शिंदे यांच्या बंडाचे नेपथ्य रचले जात असताना धर्मवीरची झालेली निर्मीती आणि नव्या चित्रपटाच्या कथानकाचे अैात्सुक्य हीच चर्चा याठिकाणी पहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांनीही आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देताना उद्धव ठाकरे यांचा नामोल्लेख टाळत केलेल्या टोलेबाजीमुळे या चित्रपटाच्या निमीत्ताने केली जाणारी राजकीय मांडणीही लक्षवेधी ठरली.

शिंदे यांच्या ऐतिहासीक बंडाच्या सव्वा महिन्यापुर्वी धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी सचिन जोशी यांची या चित्रपटाच्या निर्मीतीत महत्वाची भूमीका राहीली होती. मराठी अभिनेते आणि दिग्दर्शक मंगेश देसाई या चित्रपटाचे निर्माते तर प्रवीण तरडे हे दिग्दर्शक होते. धर्मवीर प्रदर्शित झाला तेव्हा एकनाथ शिंदे हे राज्याचे नगरविकास मंत्री होते. त्यांच्या आग्रहास्तव राज्यातील कानकोपऱ्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी धर्मवीर चित्रपटाचे विशेष खेळ प्रदर्शित केले. ‘गद्दारांना क्षमा नाही’ हे आनंद दिघे यांच्या मुखी असलेले वाक्य या चित्रपटाच्या निमीत्ताने भरपूर गाजले होते. चित्रपट प्रदर्शित होऊन महिना होताच शिंदे यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करुन राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवली. या बंडांचे नेपथ्य रचण्यात ‘धर्मवीर’चा शिंदे आणि त्यांच्या समर्थकांनी मोठया कौशल्याने वापर केल्याची चर्चाही यानिमीत्ताने सुरु झाली होती. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडयात हा चित्रपट प्रदर्शित होताच शिंदे यांचे निकटवर्तीय सचिन जोशी बराच काळ राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून अचानक दिसेनासे झाले होते. त्यांची ‘ गायब’ असण्याची चर्चा जोर धरत असतानाच शिंदे यांचा सुरत, गुहावटी, गोवा असा प्रवास पहायला मिळाला आणि धर्मवीरची आखणी आणि बंडाचे संदर्भही जोडले जाऊ लागले.

हेही वाचा… आता ‘धर्मवीर २’ चित्रपटातील दृश्य कापावे लागणार नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले स्पष्टीकरण

नव्या (राजकीय) कथानकाचे अैात्सुक्य

धर्मवीरच्या प्रदर्शनाला आणि शिंदे यांच्या बंडाला दीड वर्ष होत असताना त्यांच्या निकटवर्तीयांनी याच श्रृंखलेतील धर्मवीर २ चा सोमवारी मूहुर्त घडवून आणला. ‘साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ अशी टॅग लाईन या चित्रपटासाठी नक्की करण्यात आली असून या चित्रपटाचे कथानक नेमके कशावर बेतलेले असेल याच्या वेगवेगळ्या चर्चा यानिमीत्ताने सुरु झाल्या आहेत. ‘धर्मवीर २’ हा एकनाथ शिंदेच्या पुढील वाटचालीवर आधारित चित्रपट असेल अशा शक्यता गेल्या काही महिन्यांपासून जोर धरत असताना या चित्रपटाच्या निमीत्ताने कोणते नवे राजकीय कथानक आखले जात आहे असे अंदाजांचे पंतगही प्रदर्शनस्थळीच उपस्थितांपैकी अनेकजण दबक्या आवाजात उडविताना दिसत होते. शिंदेच्या बंडापुर्वी जसा धर्मवीर चित्रपटाला मोठा प्रतिसाद देताना ठाकरे कुटुंबियांच्या जवळ असलेल्या अनेकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला होता. बंडाची नेपथ्यरचनेत महत्वाचा ठरलेला या चित्रपटाचा सिक्वेल तितकाच चालेला का हा प्रश्नही अनेकांच्या मनात रुंजी घालत होता.

हेही वाचा… ठाणे : दिघा गाव स्थानक सुरू करा अन्यथा रस्त्यावर उतरू, खासदार राजन विचारे यांचा रेल्वेला इशारा

संजय राऊत यांनी आनंद दिघेंची मुलाखत ‘लोकप्रभा’ मध्ये छापली होती आणि त्यामुळेच दिघे यांना टाडा लागला होता. राऊत आणि मातोश्रीने दिघेंचा नेहमीच दुस्वास केला. धर्मवीरच्या पहिल्या भागात काही बंधने होती. त्यामुळे धर्मवीर आनंद दिघे यांना राऊत आणि मंडळी कसा त्रास देत होती, कसे खच्चीकरण करायचे हे दाखवले नव्हते. दिघे यांच्यासोबत नेमके काय झाले होते हे दुसऱ्या भागात आपल्याला कळेलच. – नरेश म्हस्के, शिवसेना राज्य समन्वयक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What will be in dharmaveer 2 film next journey of eknath shinde asj
Show comments