कल्याण : येथील मलंगगड रस्त्यावर सोमवारी रात्री पूर्ववैमनस्यातून आयुब शेख या तरूणाचा चार जणांनी निर्घृणपणे खून केला. कोळसेवाडी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सुजल जाधव, भावेश शिंदे या आरोपींना अटक केली आहे. फरार झालेल्या दिनेश लंके, अजित खाडे या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

मयत आयुब शेख कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागात राहतो. त्याचे याच भागातील आरोपी तरूणांबरोबर वाद होता. हा वाद दोन्ही बाजुने मिटवण्याचे ठरले होते. त्याप्रमाणे आरोपींनी आयुबला मलंगगड रस्त्यावरील नांदिवली तर्फ येथील लक्ष्मीनगर भागात बोलविले होते. आयुब सोबत त्याचे मित्र सुजर चटोले, अनिल वाल्मिकी होते. तडजोडीसाठी आरोपी सुजल, भावेश आले होते. आयुब आरोपी सुजल, भावेश बरोबर समझोत्याची चर्चा करत होता. ही चर्चा सुरू असताना तेथे आरोपी दिनेश, अजित दुचाकीवरून आले. तेही चर्चेत सहभागी होतील, असे आयुबला वाटले. परंतु, आयुबला काही समजण्याच्या आत दिनेश, अजितने आयुबाल लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण सुरू केली.

हे ही वाचा…आनंद दिघेंप्रमाणेच मुख्यमंत्री शिंदे यांच्या काळात न्याय मिळाला – खासदार नरेश म्हस्के

अजितने चाॅपरने आयुबवर वार करून त्याला जागीच ठार केले. या घटनेनंतर चारही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. ही माहिती आयुबच्या मित्रांनी कोळसेवाडी पोलिसांना दिली. तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ तपास सुरू करून दोन आरोपींना अटक केली. फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेने कल्याण पूर्वेत खळबळ उडाली आहे.