देशातील करोनामुळे बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आता अनलॉकनंतर अनेकजण नोकरी शोधण्यासाठी शहरांकडे वळू लागले आहेत. मात्र याच बेरोजगारीच्या संकटाचा फायदा घेऊन काही जण व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून लोकांची खासगी माहिती चोरुन त्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करत असल्याचे प्रकार उघडकीस आलेत. एकीकडे करोनाबाधितांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे मागील काही महिन्यांपासून सोशल मिडियावरील अफवांचे प्रमाणही वाढलं आहे. पोलिसांपासून सरकारी यंत्रणांपर्यंत आणि नोकरीपासून ते घर बसल्या पैसे कमवण्याच्या जाहिरातींपर्यंत अनेक विषयांसदर्भातील अफवा सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून व्हायरल केल्या जात आहे. अशीच एक अफवा सध्या चर्चेत आहे ती म्हणजे घरबसल्या मोबाईलचा वापर करुन दिवसाला काही हजार कमवा. मात्र अशा अफवांना लोकांनी बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

नक्की पाहा >> सायबर हल्ल्यापासून वाचवण्यासाठी मोबाइल हाताळताना ‘या’ १६ गोष्टींची काळजी घ्याच

काय आहे हा मेसेज

या मेसेजमध्ये एक पार्ट टाइम नोकरी करण्याची संधी चालून आली आहे असा दावा करण्यात आलाय. या माध्यमातून दिवसाला दोनशे ते तीन हजार रुपयांपर्यंत कमाई करता येईल. दिवसातून केवळ १० ते ३० मिनिटं काम करावं लागेल. खालील लिंकवर क्लिक करुन नाव नोंदवा. नाव नोंदवल्यानंतर तुम्हाला ५० रुपये मिळतील, असं सांगून खाली एक लिंक दिलेली असते.

पोलिसांचं आवाहन…

 

मात्र हा फसवणुकीचा प्रकार असून नागरिकांनी याला बळी पडू नये असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमधील सायबर गुन्हे विभागाच्या पोलीस उपायुक्त (डीसीपी) रश्मी करंदीकर यांनी हा मेसेज म्हणजे फसवणुकीचा प्रकार असल्याची माहिती लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना दिली. नागरिकांनी या लिंकवर क्लिक करु नये असं आवाहनही करंदीकर यांनी लोकसत्ता डॉट कॉमच्या माध्यमातून नागरिकांना केलं आहे.

यापूर्वीही घडलेत असे प्रकार

मागील अनेक महिन्यांपासून अशाप्रकारे अनेक मेसेज सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र अशा मेसेजची सत्यता पडताळूनच ते फॉरवर्ड करावेत असं आवाहन पोलीस वारंवार करत असतात. चीनकडून फिशिंग तंत्राच्या माध्यमातून सायबर हल्ले केले जाऊ शकतात, असा इशारा महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने जून महिन्यामध्ये दिला होता. अशा बनावट मेसेजपासून सावध राहण्याचा इशारा पोलिसांनी ट्विटवरवरुन अनेकदा देत असतात. सध्याच्या काळात भारत-चीन सीमेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर चिनी हॅकर्स भारतावर मोठा सायबर हल्ला करण्याची शक्यता असल्याने सतर्कता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागामार्फत करण्यात आलं होतं.

नक्की वाचा >> ‘तुळशीबाग, FC रोड, सदाशिव पेठ सगळीकडे जाऊ पण…’; पुणे पोलिसांनीच शेअर केले भन्नाट ‘करोना उखाणे’