मध्य प्रदेशातील नरसिंगपूर येथून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ती म्हणजे महंत कनक बिहारी महाराज यांचा बरमन-सगरी राष्ट्रीय महामार्ग- ४४ वर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात त्यांची कार दुभाजकाला धडकून पलटी झाली, ज्यामध्ये महाराजांसह इतर दोघांना आपला जीव गमवावा लागला. तर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
महंत कनक बिहारी दास महाराजांनी अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या उभारणीसाठी एक कोटीहून अधिक देणगी दिली होती. तेव्हापासून त्यांचे नाव खूप चर्चेत होते. रघुवंश शिरोमणी १००८ म्हणून ओळखले जाणारे कनक बिहारी दास महाराज हे रघुवंशी समाजाचे राष्ट्रीय संत म्हणूनही ओळखले जायचे. महाराजांचा आश्रम मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील नोनी येथे होता. महाराज उत्तर प्रदेशातील प्रयागराजहून छिंदवाडा येथे परतणार होते. पण बरमान-सगरी राष्ट्रीय महामार्ग-४४ वर झालेल्या भीषण अपघात त्यांचा मृत्यू झाला.
रघुवंशी समाजाचे नरसिंहपूर जिल्हाध्यक्ष राजकुमार रघुवंशी यांनी सांगितले की, महंत कनक महाराज यांनी राम मंदिरासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिली होती. याशिवाय १० फेब्रुवारी २०२४ पासून ते अयोध्येत ९ कुंडीय यज्ञ करणार होते. त्याच्या तयारीसाठी ते रघुवंशी समाजाच्या सर्व गावांना ते भेटी देत होते.
सोमवारी ते छिंदवाडा येथे जात असताना गुना जिल्ह्याजवळ बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची कार दुभाजकावर आदळली आणि त्यातच त्यांना जीव गमवावा लागला. महाराजांसोबत कारमधून प्रवास करणारे छिंदवाडा येथील विश्राम रघुवंशी यांचाहा अपघातात मृत्यू झाला. तर आणखी एका शिष्याचा मृत्यू झाला आहे. अपघातात महाराजांसह अन्य दोघांचा अकाली मृत्यी झाल्याने समाज व परिसरात शोककळा पसरली आहे. तर अनेक संत महतांनी महाराजांच्या अपघाती निधनानंतर तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे.