Mumbai Police Issue Traffic Advisory for Anant Ambani’s Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट १२ जुलै रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत, लग्नकार्य सुरु झाले असून देशविदेशातून पाहुण्यांचे आगमन होत आहे. संपूर्ण अंबानी कुटुंबीय आणि बॉलिवूड सेलिब्रिटी या लग्नसोहळ्या पूर्वीच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत आहेत. एकीकडे लग्नसमारंभात सहभागी होण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटींची गर्दी होत आहे, तर दुसरीकडे हॉलिवूड सेलिब्रिटी देखील यात सहभागी होण्यासाठी मुंबईत दाखल होत आहेत.
हे लग्न इतके हाय प्रोफाइल झाले की मुंबई पोलिसांनाही विशेष बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी लोकांसाठी एक ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी केली आहे, जी पाहून लोक चांगलेच भडकले आहेत. ट्रॅफिक ॲडव्हायझरीमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे, अशा परिस्थितीत आपला राग सोशल मीडियावर आपल्या पद्धतीने काढत आहेत.
लोकांना जिओ सेंटर रोड टाळण्याचा सल्ला
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या हाय-प्रोफाइल लग्नासंदर्भात मुंबईकरांसाठी ट्रॅफिक ॲडव्हायझरी जारी केली आहे. ॲडव्हायझरीनुसार, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) आणि जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरच्या आजूबाजूला रस्ते ब्लॉक करण्यासाठी आणि मार्ग वळवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
१२ जुलै ते १५ जुलै दरम्यान हा विवाह सोहळा चालणार आहे. यासाठी, मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, १२ ते १५ जुलै या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, बीकेसी, वांद्रे (पू) मुंबई येथे अनेक भव्य कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पाहुणे उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी लोकांनी Jio वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवास करणे टाळावे.
लोकांनी सोशल मीडियावर व्यक्त केली नाराजी
पण मुंबईकरांना ही ट्रॅफिक ॲडव्हायजरी आवडलेली नाही. लोकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. एक्स हँडलवरील एका युजरने टिप्पणी केली की, उद्योगपतीचा खाजगी कार्यक्रम सार्वजनिक कार्यक्रम कधी झाला? मुंबईतील प्रत्येक नागरिकाला आमंत्रित केले आहे की काही निवडक लोकांना? सर्वसामान्यांची गैरसोय होण्याऐवजी, दिवसा, कदाचित रात्रीचे वेळापत्रक बदलण्यास आयोजकांना सांगायला हवे होते.
आणखी एका युजरने विचारले की, अनंत अंबानींचे लग्न सार्वजनिक कार्यक्रम आहे का? कुणाच्या लग्नाचा त्रास सर्वसामान्य जनतेला का? आणखी एका युजरने विचारले की, सरकारने खाजगी कार्यक्रमांमध्ये हस्तक्षेप कधीपासून सुरू केला? सरकारने मुंबईत सुट्टी जाहीर करावी.