Mumbai Rains shocking video: मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर आता आज रेड अलर्ट देण्यात आला आहे. शाळांना देखील सुट्टी देण्यात आली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने काल रेल्वेसेवा विस्कळित होती. आज पुन्हा सर्व सुरळीत झालं आहे. कालच्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. रस्त्यांना अक्षरश: नदीचं स्वरुप आल्यासारखं वाटतं होतं. अशातच मुंबईतल्या गोरेगावमधील एका सोसायटीत मगरीसारखा दिसणारा एक विचित्र प्राणी पाहायला मिळाला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.

मुंबई, विशेषत: अंधेरीशी संबंधित पोस्ट शेअर करणाऱ्या एका इन्स्टाग्राम पेजने गुरुवारी सकाळी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी कॅप्शनमध्ये “गेल्या २४ तासांत मुसळधार पावसानंतर मगरीसाराखा दिसणारा हा प्राणी समोर आला.” अशी माहिती दिली आहे. हा प्राणी मानवी वस्तीत कसा आला हेही स्पष्ट झालेले नाही.

गोरेगाव पूर्व येथील एका सोसायटीमध्ये रहिवासी त्यांच्या इमारतीत फेरफटका मारताना त्याला हा प्राणी दिसला. त्यानंतर तो घाबरून घरात गेला आणि घराच्या खिडकीतून त्यानं या प्राण्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा प्राणी हळू हळू तिथून जाताना दिसत आहे, यावेळी तो त्याची जीभही बाहेर काढत आहे. त्यानंतर तो पुढे निघून जाताना दिसत आहे. काही जण या प्राण्याला घोरपड म्हणत आहेत, काहीजण म्हणतायत हा मगरीसारखा दिसतोय तर काहीजण मोठा सरडा असल्याचा अंदाज लावत आहेत. मात्र हा प्राणी नेमका कोणता आहे हे कळत नाहीये. हा व्हिडिओ आधीच व्हायरल झाला असून एका तासातच व्हिडीओला ४७,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. सुरक्षिततेसाठी नेटकरी घाबरले असून काळजीत पडले आहेत. काही वापरकर्त्यांनी या घटनेचा शोध घेण्यासाठी बचाव संस्थांना सतर्क करण्याचा प्रयत्न केला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आला रे आला, फ्लिपकार्ट अन् अॅमेझॉनचा सेल आला; २४ तासांत गूगल ट्रेंड्समध्ये सर्वाधिक सर्च झाले हे सेल

हा व्हिडीओ गेल्या काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी पाहिला आहे. अन् हा व्हिडीओ पाहून नेटकरी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचं कौतुक करत आहेत. कारण त्यांनी या प्राण्याला कुठल्याही प्रकारची इजा पोहोचवण्याचा प्रयत्न केला नाही. दरम्यान काही लोकांनी या घटनेसाठी माणूसच कसा जबाबदार असल्याचं सांगितलं आहे. कारण गेल्या काही काळात आरे कॉलनीत मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाली आहे. अन् त्यामुळे हे जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरत आहेत.