राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार निवडीच्या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण या निवडणुकीमध्ये उमेदवारांच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलंय. मात्र याच मुद्दयावरुन आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी खोचक शब्दांमध्ये शरद पवारांबरोबरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. आज दिल्लीमध्ये राष्ट्रपती पदाच्या उमेदवार निवडीसाठी विरोधीपक्षांची बैठक होणार असून त्यापूर्वीच निलेश राणेंनी ट्विटरवरुन यासंदर्भात भाष्य केलंय.

नक्की वाचा >> “अहंकारी मनुष्य ‘आपण मोठे आहोत’ अशी…”; अजित पवारांना भाषण न करु दिल्याने रोहित पवारांनी कठोर शब्दांत व्यक्त केला संताप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पवार दिल्लीला जाण्यापूर्वी सोमवारी (१३ जून २०२२ रोजी) मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी आपण विरोधकांचे उमेदवार नसू असं स्पष्ट केलं होतं. “मी शर्यतीत नाही. मी राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाचा उमेदवार असणार नाही,” असं शरद पवारांनी यावेळी उपस्थित कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं होतं. याच मुद्द्यावरुन निलेश राणे यांनी मंगळवारी ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत शरद पवार यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलंय.

“पवार साहेब, राष्ट्रपती निवडणुकीतून पराभवाच्या भीतीने माघार घेण्याचा निर्णय तुमचा योग्य आहे; कारण तुमच्याकडे मुख्यमंत्री आहेत. ते तुम्हाला म्हणतील, ‘मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती, मग जिंकायची गरज काय? आजपासून तुम्ही राष्ट्रपती,’ असं खोचक ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगााबादमधील सभेत औरंगाबाद शहराच्या नामकरणावर भाष्य केले होते. यावेळी बोलताना, ‘संभाजीनगर नाव होवो की न होवो, मी म्हणतोय ना संभाजीनगर,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. याचाच संदर्भ घेत निलेश राणे यांनी ट्वीटरवरुन आता राष्ट्रपती निवडणुकीचा संदर्भ देत महाविकास आघाडीच्या दोन प्रमुख नेत्यांना लक्ष्य केलंय.

नक्की वाचा >> अजित पवारांना देहूमधील कार्यक्रमात बोलू न दिल्याने संजय राऊत संतापून म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राला…”

आज महत्वाची बैठक
विरोधकांचा सहमतीचा उमेदवार म्हणून शरद पवार यांचे नाव सुचवण्यात आले असले तरी, पवारांनी हा पर्याय फेटाळला आहे. राष्ट्रपती पदासाठी पवार उभे राहण्यास तयार नसल्याने अन्य नावांचा विचार केला जात असून पवारांच्या निवासस्थानी मंगळवारी झालेल्या बैठकांमध्ये संभाव्य नावांची चर्चा झाल्याचे समजते. काँग्रेसने पवारांच्या नावाला पाठिंबा दिला होता. मात्र, नितीश कुमार व गुलाम नबी आझाद यांच्या नावाचीही चर्चा केली जात आहे. त्यापैकी आझाद यांचे नाव काँग्रेसला मान्य होण्याची शक्यता नाही. त्यामुळे संभाव्य नावांवर खल केला जात आहे. शरद पवार मंगळवारी दिल्लीत दाखल जाल्यापासून यासंदर्भातील घडामोडींना वेग आल्याचं चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बनर्जी यांनीही पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. आज या चर्चेत काँग्रेसही सहभागी होणार आहे.

राष्ट्रपतीपदासाठी विरोधकांचा संयुक्त उमेदवार ; शरद पवार-खरगे चर्चा

आपचा पाठिंबा
पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी दिवसभर राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होत होत्या. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी पवार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी संजय सिंह यांनी मुंबईत पवारांची भेट घेतली होती व सर्वसंमतीने पवारांच्या उमेदवारीला ‘आप’ पाठिंबा देईल असेही स्पष्ट केले होते.

काँग्रेसचा आधी नकार नंतर होकार
राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असतानाही तृणमूल काँग्रेसने वेगवान हालचाली करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, द्रमुक, आप, शिवसेना यांच्यासह अन्य प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहून दिल्लीमध्ये बुधवारी कॉन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते. तृणमूल काँग्रेसच्या आक्रमक भूमिकेवर काँग्रेस, माकप, द्रमुक आदी पक्षांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे हे पक्ष बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता नसल्याचे मानले जात होते. मात्र, काँग्रेसने ममतांच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला काँग्रेसच्या वतीने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी खरगे यांना अन्य पक्षांशी समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवली आहे.

आघाडीच्या पराभवाबद्दल शरद पवारांची नाराजी ; मंत्र्यांची कानउघडणी

भाजपाकडे २० हजार मतमूल्यांची कमतरता
राष्ट्रपती पदाचा उमेदवार जिंकून आणण्यासाठी भाजपकडे सुमारे २० हजार मतमूल्यांची कमतरता असून बिजू जनता दल व वायएसआर काँग्रेस या दोन पक्षांच्या मदतीने हा टप्पा पार करणे भाजपसाठी कठीण नाही. तरीही विरोधी पक्षांनी महाआघाडीचा सहमतीचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. ही विरोधकांची २०२४ मधील लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी मानली जात आहे.

निवडणुकीचं राजकीय समिकरण
सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि विरोधक या दोघांनीही त्यांच्या उमेदवाराचे नाव अद्याप घोषित केले नाही. त्यामुळे या निवडणुकीविषयीची उत्सुकता अधिक ताणली गेली आहे. आकड्यांच्या समीकरणात ४८% मते असलेला एनडीएचा उमेदवार हा शर्यतीत सर्वात पुढे असणार आहे. ओडिसातील बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशातील वायएसआरसीपी यांसारख्या मित्रपक्षांच्या साथीने एनडीएच्या उमेदवाराचा विजय सोपा होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्ष मात्र राष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध न होता गेल्या निवडणुकीप्रमाणेच यावेळीही लढत व्हावी यासाठी प्रयत्नशील आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत चर्चा केली आहे. या निवडणुकीसाठी कॉंग्रेसतर्फे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे समन्वयकाची भूमिका पार पाडणार आहेत.

निवडणूक कधी?
निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ जून असणार आहे. १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, “आयोगाने मतदानाच्या दिवशी कोविड प्रोटोकॉल पाळण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आमदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२३१ आहे, तर खासदारांच्या एकूण मतांचे मूल्य ५,४३,२०० आहे. दोन्ही मतदारांच्या मतांचे एकूण मूल्य १०,८६,४३१ आहे. खासदारांच्या एका मताचे मूल्य ७०० आहे. खासदारांना संसद भवनात मतदान करणे बंधनकारक असणार आहे. तर आमदाय त्यांच्या त्यांच्या राज्यात विधानभवनात मतदान करतील.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nilesh rane satirical tweet on sharad pawar president election candidate scsg
Show comments