Pahalgam Terror Attack Seema Haider : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर बुधवारी भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याचदरम्यान पाकिस्तानातून भारतात पळून आलेली सीमा हैदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ट्रेंड करताना दिसतेय. अनेकांनी भारत सरकारच्या आदेशानंतर आता सीमा हैदरबाबत चर्चा सुरू केली आहे.
पाकिस्तानबाबत सरकारने कडक भूमिका घेतल्यानंतर सोशल मीडियावर लोक विचारत आहेत की, सीमा हैदरलाही पाकिस्तानात परत जावे लागेल का? पाकिस्तानची सीमा हैदर तिच्या चार मुलांसह नेपाळमार्गे बेकायदा भारतात आली. सध्या ती तिचा प्रियकर सचिन मीनाबरोबर ग्रेटर नोएडामध्ये राहते.
सीमाने भारतात येताच सचिनबरोबर हिंदू पद्धतीने लग्न केले. त्यावेळी सीमाने पाकिस्तानमधील तिचा पहिला पती गुलाम हैदर याच्या छळाला कंटाळून, ती पाकिस्तान सोडून भारतात आली, असा दावा केला होता. सध्या सीमा हैदर यांच्या नागरिकत्वाचा आणि बेकायदा स्थलांतराचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे.
दरम्यान सोशल मीडियावर आता अनेक युजर्स सीमा हैदरला पाकिस्तानला पाठवण्याचा सल्ला देत आहेत. काहीजण सीमा हैदरला आता भारत सोडावा लागेल असा दावा करताना दिसतात. तर काही सीमा हैदरला उगीचचं स्टार बनवल्यानं नाराजी व्यक्त करत आहेत.
सरकारने पाकिस्तानविरुद्ध कोणती भूमिका घेतली?
भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले, ‘भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू नदी पाणी करार स्थगित करण्यात आला आहे. अटारी सीमादेखील बंद करण्यात आली आहे. त्यासह पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देणेदेखील थांबविण्यात आले आहे. तसेच उच्चायुक्तालयातील कर्मचाऱ्यांची संख्या ५५ वरून ३० पर्यंत कमी केली जाईल.