Sanjay Raut Twitter Shayari: महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) निवडणुकीत विजयी होतील असा विश्वास व्यक्त करणारे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी व्यक्त केल्यानंतर ट्विटवरुनही एक सूचक विधान केलंय. राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (१० जून २०२२) सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीसाठी राज्यात कमालीची चुरस निर्माण झाली असून भाजपा, शिवसेना आणि काँग्रेसचा कोणता उमेदवार पराभूत होणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागलंय. घोडेबाजाराच्या आरोपामुळे गाजलेल्या या निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत. असं असतानाच संजय राऊत यांनी आता शेरोशायरीमधून ट्विटरवरुन सूचक विधान केलंय. (राज्यसभा निवडणुकीचे लाइव्ह अपडेट्स तुम्ही येथे क्लिक करुन पाहू शकता.)

नक्की वाचा >> Rajya Sabha Election: “महाविकास आघाडीने जनाची नाही पण मनाचीही सोडली, तर शिवसेनेचं…”; MIM चा पाठिंबा घेतल्याने मनसेचा संताप

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदानाच्या पहिल्या दीड तासांत ५० टक्के आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. १४३ आमदारांना मतदानाचा हक्क बजावला आहे. भाजपाच्या ६० पेक्षा अधिक आमदारांनी मतदान केलं आहे. तर, काँग्रेसच्या २० आमदरांचं मतदान झालं आहे. दरम्यान याच निवडणुकीसंदर्भात प्रसारमाध्यमांशी भाष्य करताना संजय राऊत यांनी, राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. तसेच महाविकास आघाडीत कोणतीही नाराजी नाही. विरोधी पक्षाकडून चूकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या राज्यसभेच्या खासदारकीचं भविष्यही या निवडणुकीमध्ये मतपेटीत बंद होणार आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलून झाल्यानंतर काही वेळातच संजय राऊत यांनी स्वत:च्या डोळ्यांचा फोटो ट्विटरवरुन पोस्ट करत शेरोशायरीच्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य केलंय. “झुठी शान के परिंदे ही ज्यादा फडफडाते हैं…! बाझ की उडान मे कभी आवाज नही होती..!,” अशा कॅप्शनसहीत राऊत यांनी स्वत:च्या डोळ्यांचा फोटो ट्विट केलाय.

भाजपा शिवसेनेमध्ये चुरशीची लढाई
सहाव्या जागेसाठी शिवसेना व भाजपामध्ये चुरशीची लढत आहे. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या ४१.०१ मतांची आवश्यकता आहे. शिवसेना व भाजपाला अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्यासाठी अपक्ष व छोटय़ा पक्षांची गरज लागणार आहे. अपक्ष व छोटय़ा पक्षांचे २९ आमदार असून, ते कोणती भूमिका घेतात यावर शिवसेना व भाजपाचे भवितव्य अवलंबून आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने मतांचे नियोजन करताना परस्परांना फायदा होईल, अशी व्यवस्था केली आहे. तिन्ही पक्षांच्या आमदारांनी दुसऱ्या पसंतीची मते शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराला द्यावीत, अशी सूचना करण्यात आली आहे. तिन्ही पक्षांनी गुरुवारी सायंकाळी पहिल्या व दुसऱ्या पसंतीची मते कोणाला द्यायची याचे प्रशिक्षण आमदारांना देण्यात आले.

काँग्रेसचा सावध पवित्रा
शिवसेना आणि भाजपामध्ये अतिरिक्त जागेवरून चुरस निर्माण झाली असतानाच, दुसरीकडे भाजपाने काँग्रेस उमेदवाराला पराभूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसचा उमेदवार पराभूत होणे, हे भाजपासाठी अधिक फायद्याचे आहे. त्यातून राज्यसभेतील काँग्रेसचे संख्याबळ कमी होऊ शकेल. मात्र, बाहेरचा उमेदवार आणि आमदारांमधील नाराजी यातून काँग्रेसने खबरदारी घेतली आहे. नाराज आमदारांशी पक्षाच्या नेत्यांनी वैयक्तिक चर्चा केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajya sabha election 2022 sanjay raut twitter shayari scsg