Ratan Tata Death police officer crying video: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतातच नव्हे, तर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर कोट्यवधी भारतीयांचे डोळे ओलावल्याचे पाहायला मिळत आहे. आता वरळीत रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतरचा एक प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रतन टाटा अनंतात विलीन झाल्यानंतर सगळे व्हीआयपी स्मशानभूमीबाहेर आले अन् एवढा वेळ श्वास रोखून कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांनीही आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. याबाबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हा फोटो पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

आयुष्यभर ज्यांना हसतमुख, कार्यरत असताना पाहिले, त्यांना निश्चल झाल्याचे पाहावे लागणार ही भावनाच अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणत होती. यावेळी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनाही आपले अश्रू अनावर झाले. पोलीस अधिकारी म्हटले की, त्याचा एक वेगळाच रुबाब आणि दरारा असतो. खूप कमी वेळा पोलिस अधिकाऱ्यांच्या खाकी वर्दीमागचे रूप पाहायला मिळते. एरवी कठोर असणारे हेच मुंबई पोलीस रतन टाटा गेल्यानंतर मात्र नतमस्तक होऊन रडताना दिसले. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, रतन टाटा अनंतात विलीन झाल्यानंतर सगळे व्हीआयपी स्मशानभूमीबाहेर आले अन् मग तोपर्यंत शांत असलेला त्यांचा जीवलग मित्र शांतनूही रडू लागला. त्यानंतर तिथे उपस्थित पोलिसही त्याला धीर देताना त्याच्यासमोर आपली खाकी टोपी काढून नतमस्तक होऊन रडू लागले. हा संपूर्ण क्षण अक्षरश: हेलावून टाकणारा आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> देव चोरला माझा देव चोरला! रतन टाटांचा फोटो देव्हाऱ्यात ठेवून तरुण झाला नतमस्तक; VIDEO पाहून सर्वांचेच डोळे पाणावले

रतन टाटांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांचा जीवलग मित्र म्हणून ओळख असलेल्या शांतनू नायडूने सर्वांचे लक्ष वेधले होते. रतन टाटा यांचे पार्थिव गाडीतून घेऊन जाताना शांतनू नायडू त्या गाडीच्या पुढे दुचाकी चालवत असल्याचे दिसला. हा प्रसंग पाहून सर्व भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

Who is shantanu naidu: शांतनू नायडू कोण आहे?

शांतनू नायडू हा रतन टाटांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक आहे. त्यांचा मित्र व सहाय्यक म्हणून तो ओळखला जातो. रतन टाटा आणि शांतनू नायडू यांच्यातील मैत्रीचा समान धागा म्हणजे दोघांचेही समाजावर असलेले प्रेम. दोघांची पहिली ओळख २०१४ साली झाली होती. गेल्या दहा वर्षांपासून शांतनू आणि रतन टाटा यांची मैत्री होती. रतन टाटांच्या शेवटच्या काही दिवसांत शांतनूच त्यांच्यासोबत होता. शांतनू नायडू हा टाटा ऑफिसमध्ये जनरल मॅनेजरच्या पदावर काम करतो. तसंच, नव्या स्टार्टअप्ससाठी टाटा ग्रुपला गुंतवणुकीसाठी सल्ले देतो. इतकंच नव्हे तर शांतनूची स्वतःची एक संस्था आहे.