Amarnath Yatra accident video: कार चालविणे हे कौशल्याचे काम आहे. वाहन चालविताना अनेकदा समोर अचानक कोणी तरी येते. समोरील वाहनाचा ब्रेक अचानक लागतो वा इतर अनेक आव्हाने समोर येतात. पावसाळ्यात गाड्यांची काळजी न घेतल्यास आपल्याला मोठा फटका बसू शकतो. अनेकदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये गाडीमध्ये पाणी जाऊन, गाडीच्या एखाद्या भागात बिघाड होऊन, गाडी अचानक बंद पडण्याची शक्यता असते. विशेषतः प्रवासात अचानक ब्रेक बंद पडल्यास जीवसुद्धा धोक्यात येऊ शकतो. अशीच एक थरारक घटना अमरनाथमधून समोर आली आहे. अमरनाथच्या दर्शनाहून पंजाबच्या दिशेने निघालेल्या बसचे ब्रेक फेल झाले. या घटनेचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ब्रेक फेल झाला अन् लोकांनी धावत्या गाडीतून मारल्या उड्या

जम्मू-काश्मीरमध्ये नुकतीच अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली असून, सध्या या यात्रामार्गावर अनेक प्रवाशांची वर्दळ पाहायला मिळत आहे. पण, याच यात्रामार्गावरील प्रवासाला गालबोट लागले असून, नुकतीच एक दुर्दैवी घटना घडली. त्यामध्ये अनेक प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले. हृदयद्रावक बाब म्हणजे बसचे ब्रेक निकामी झाले तेव्हा बस उतारावर होती. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जम्मू-काश्मीरमधील रामबन येथे यात्रेकरूंच्या बसचे ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच प्रवाशांमध्ये गोंधळ माजला. अनेक प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी धावत्या बसमधून उड्या मारल्या. त्यामुळे ते गंभीररीत्या जखमी झाले. बसचा वेग पाहता, प्रवाशांची काय अवस्था झाली असेल याचा विचारही करणे कठीण होते.

दरम्यान, लष्करी जवानांनी हुशारी दाखवून बसवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. भारतीय सैन्याच्या जवानांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत मिळून बसची गती कमी केली. त्या बसची गती कमी करण्यासाठी त्यांनी चाकांखाली दगड ठेवून बसच्या गतीवर नियंत्रण मिळविण्याचा भरपूर प्रयत्न केला अन् त्यात ते यशस्वी झाले. त्यामुळे बस नाल्यात पडता पडता वाचली.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला

हे सगळे प्रवासी पंजाब होशियारपूरला चालले होते. बनिहालच्या जवळ नचलाना येथे पोहोचल्यानंतर बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे चालक बस थांबवू शकला नाही. मात्र, त्यानंतर सैन्याची क्विक रिअॅक्शन टीम रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचली आणि त्या पथकातील जवानांनी सर्व जखमींना मदत करीत जवळच्या रुग्णालयात दाखल केले.

नुकत्याच झालेल्या अपघातात २२ जणांनी गमावले जीव

डोंगराळ रस्त्यांवर ब्रेक फेल होण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीही मे महिन्यात जम्मूच्या अखनूरमध्ये बसचे ब्रेक निकामी झाले होते. बसमध्ये दोन वेगवेगळ्या राज्यांतील एकूण ८० लोक प्रवास करीत होते. त्यावेळी अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला आणि ५० हून अधिक लोक जखमी झाले होते.