पावसाचे दिवस सुरू आहेत. अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे नदी, तलाव व धबधबे ओसंडून वाहतायत. मोठ्या संख्येने पर्यटक अशा ठिकाणांना भेट देण्यासाठी गर्दी करीत आहेत. पण, ही ठिकाणं पावसात जितकी सुंदर दिसतात तितकीच धोकादायकही आहेत. अनेकदा अशा ठिकाणी जीवघेण्या अपघाताच्या घटना घडतात. पण, आता अशी एक घटना समोर आली आहे; ज्याचा कोणी विचारही केला नसेल. तुम्ही आतापर्यंत अनेक घटना पाहिल्या असतील की, धबधब्याखाली भिजताना अचानक पाणी वाढल्याने लोक अडकले, तर काही वाढत्या पाण्याबरोबर वाहून गेले आणि त्यात काहींचा जीवही गेला. पण, व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत धबधब्याखाली भिजणाऱ्या एका व्यक्तीबरोबर अतिशय धोकादायक घटना घडली आहे.
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तरुणांचा एक ग्रुप धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेत आहेत. यावेळी त्यांच्यातील एक तरुण त्याच्या पॅन्टमध्ये विचित्र हालचाली जाणवल्याने खूप घाबरला, अशा परिस्थितीत तो पाण्यातून बाहेर आला. बाहेर आल्यानंतर जेव्हा त्याने पॅन्टकडे पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण- त्याच्या पॅन्टच्या आत एक भलामोठा साप शिरला होता. हा साप तरुणाच्या पॅन्टमध्ये वरपर्यंत घुसला होता आणि त्यामुळे तो खूपच घाबरला होता. त्या परिस्थितीत त्याला नेमके काय करावे तेच सुचत नव्हते.
तरुणाला जेव्हा आपल्या पॅन्टमध्ये साप शिरल्याचे दिसले तेव्हा त्याने त्याचे तोंड पॅन्टमध्ये पकडून ठेवले होते. पण अडचण अशी होती की, जर त्याने सापाचे तोंड सोडले असते, तर तो चावला असता आणि पकडून ठेवले, तर त्या सापाला बाहेर काढायचे कसे? काही वेळ विचार केल्यानंतर त्या तरुणाने मित्रांच्या मदतीने कसेबसे सापाला पॅन्टमधून बाहेर काढले. त्या व्यक्तीने पटकन सापाचे तोंड सोडले आणि मित्रांनी लगेच त्याची शेपटी पकडून, त्याला पॅन्टमधून बाहेर खेचले.
या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, काही लोक त्यावर मजेशीर कमेंट्स करीत आहेत. हा व्हिडीओ शेअर करीत, सावध राहा, सतर्क राहा, असे लिहिण्यात आले आहे. पण, तुम्हीही अशा कोणत्याही ठिकाणी पाण्यात विहार करताना यांसारख्या गोष्टी लक्षात घेऊन, आवश्यक ती काळजी घ्या.
या व्हिडीओवर एका युजरने लिहिले की, मित्रांना सलाम! जो कठीण प्रसंगी साथ देतो, तोच खरा मित्र असतो. दुसऱ्या युजरने लिहिले की, फक्त त्याच्याकडे बघूनच माझी प्रकृती बिघडली; मग तो कोणत्या परिस्थितीतून गेला असेल? तिसऱ्या युजरने लिहिले की, कठीण काळात तुम्हाला साथ देणारे आणि प्रोत्साहन देणारे कोणी असेल, तर प्रत्येक अडचणीशी लढता येईल. शेवटी एकाने लिहिले की, ही खूप भीतीदायक परिस्थिती होती. अशा परिस्थितीत त्याला पाठिंबा देणाऱ्या मित्रांचे आभार मानले पाहिजेत.
© IE Online Media Services (P) Ltd