Viral Video: सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून, या दिवसांत सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. या व्हिडीओंमध्ये कधी अनेक लोक पावसाचा आनंद लुटताना दिसतात, रील्स बनविताना दिसतात. पण, मनोरंजनाव्यतिरिक्त बऱ्याचदा पावसाळ्यात अनेकदा थरकाप उडविणाऱ्या घटनादेखील घडतात. काही दिवसांपूर्वी लोणावळ्यातील भुशी डॅम या धबधब्यावर मौजमजेसाठी गेलेले एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. हा सोशल मीडियावरील व्हिडीओ खूप चर्चेत आला होता. अशा प्रकारच्या विविध दुर्घटना पावसाळ्यात बऱ्याच ठिकाणी घडतात. पण, फरक फक्त इतकाच असतो की, काही जण धबधब्यावर मौजमजा करण्याच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात घालतात; तर काही जणांना मजबुरी म्हणून पावसाळ्यातील नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागते. आता अशाच प्रकारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात काही शालेय विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी तारेवरची कसरत करताना दिसत आहेत.

खेड्यातील अनेक ठिकाणी पावसाळ्यात पाणी साठते, नद्यांना पूर येतो. अशा वेळी विद्यार्थ्यांना शाळेपर्यंच पोहोचण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे आपण पाहतो. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाणी साठलेल्या एका ओढ्यातून काही शालेय विद्यार्थी जाताना दिसत आहेत. यावेळी ते ओढ्याच्या पलीकडे जाण्यासाठी एका बोटीचा वापर करतात आणि ही बोट एक व्यक्ती चालवीत असल्याचे दिसत आहे. यावेळी बोटीत बसलेल्या चार विद्यार्थ्यांनी बोटीला घट्ट पकडल्याचे दिसत आहे. बोट हळूहळू पुढे जाते तसा पाण्याचा प्रवाहदेखील वाढतो; पण शेवटी ते विद्यार्थी सुखरूप किनाऱ्यापर्यंत पोहोचतात. या व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने, “जेव्हा तुम्ही अभ्यासातील अडथळे दूर करता”, असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

हेही वाचा: “भीगी भीगी सड़कों पे मैं…” श्वान घेतोय पाऊस पाहण्याचा आनंद; VIDEO पाहून पोटधरून हसाल

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ X(ट्विटर)वरील @Solo para Curiosos या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, तो परदेशातील असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १३ हजारांपर्यंत व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर अनेक नेटकरीदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “हे लहान मुलांसाठी योग्य नाही.” तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “त्या उत्कृष्ट इच्छाशक्तीसाठी टाळ्या.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “तुम्ही कोठून सुरुवात करता यानं काही फरक पडत नाही; परंतु तुम्ही कुठे पूर्ण करता हे जास्त महत्त्वाचं आहे.”