Vijay Shekhar Sharma Post on Ratan Tata: भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनानंतर जगभरातून त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली जात आहे. उद्योगपती, राजकारणी, क्रीडापडू, कलाकार आणि सामान्य माणसांपर्यंत अनेकजण रतन टाटांच्या निधनाबद्दल अश्रू ढाळत आहेत. अशातच पेटीएमचे सीईओ विजय शेखर शर्मा यांनी श्रद्धांजली निमित्ताने केलेली एक पोस्ट वादग्रस्त ठरली आहे. सोशल मीडियावर अनेकांनी शर्मा यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांनी ही पोस्ट डिलीट केली. मात्र त्याचा स्क्रिनशॉटला व्हायरल करून शर्मा यांच्या असंवेदनशील वृत्तीवर लोक टीका करत आहेत. सदर पोस्ट डिलीट करून शर्मा यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

काय म्हणाले होते विजय शेखर शर्मा?

विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम कंपनीची स्थापना करून उद्योगजगतात यश मिळवले. त्यांची स्वतःची संपत्ती एक अब्जावरून अधिक आहे. उद्योगपती रतन टाटा यांना यांना भारतातील आणि जगभरातील उद्योजक, व्यावसायिक श्रद्धांजली वाहत आहेत. त्याप्रमाणेच शर्मा यांनीही त्यांच्याबद्दल चांगले लिहिण्याचा प्रयत्न केला. पण शेवटच्या ओळीने त्यांचा घात केला. शर्मा असंवेदनशील असल्याचा ठपका यानिमित्ताने त्यांच्यावर ठेवला गेला.

आपल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “रतन टाटा यांनी अनेक पिढ्यांना प्रेरणा दिली. पुढील पिढ्यातील व्यावसायिक त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी गमावणार आहेत. सलाम सर. ओके टाटा बाय बाय…”

हे वाचा >> Ratan Tata: गरिबांचा कैवारी! रतन टाटांनी जेव्हा पेपरवाल्याला केली होती ५ लाखांची मदत, २० वर्ष घरी वर्तमान पत्र देणाऱ्याने सांगितली आठवण

विजय शेखर शर्मा यांनी शेवटच्या ओळीत “Ok Tata Bye Bye” असे लिहिल्यामुळे त्यांना सोशल मीडियावरील टीकेचा सामना करावा लागला. एका युजरने एक्सवर लिहिले की, कंपनीतील एखाद्या शिकाऊ कर्मचाऱ्याकडून पोस्ट लिहून घेता का? तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, हे महाशय चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाहीत. तर आणखी एका युजरने म्हटले की, हे अंसवेदनशील वृत्ती आहे.

मायक्रोसॉफ्टचे प्रमुख बिल गेट्स, भारतातील आघाडीचे उद्योगपती गौतम अदाणी, मुकेश अंबानी, इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि आनंद महिंद्रा यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली व्यक्त केली. तर नव्या पिढीतील ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल, पीपल ग्रुपचे अनुपम मित्तल, शाओमीचे माजी सीईओ मनू कुमार जैन, भारतपेचे संस्थापक आणि माजी सीईओ अशनीर ग्रोव्हर यांनीही आदारांजली व्यक्त केली. रतन टाटा यांनी उद्योग समूह शिखरावर नेला तरीही त्यांचे पाय जमिनीवर कायम होते, हे मोठेपण, नम्रता शिकण्यासारखी आहे, असे अनेक उद्योजकांनी म्हटले.