Viral Video : लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा आणि तितकाच महत्त्वाचा क्षण असतो. पूर्वी घरातील मंडळींनी निवडलेल्या जोडीदाराबरोबरच लग्न लावून दिलं जायचं; पण हल्ली तरुण पिढी स्वत:चा जोडीदार स्वत:च शोधते. आता तरुणांप्रमाणे तरुणींच्याही होणाऱ्या जोडीदाराबद्दल खूप अपेक्षा असतात; पण अनेकदा तरुणांपेक्षा तरुणींच्या अपेक्षा फारच जास्त असतात. जोडीदाराचे शिक्षण, रूप, उंची, घरातील परिस्थिती आणि महत्त्वाचे म्हणजे तो नोकरी कुठे करतोय हे आधी पाहिले जाते. त्यातही जोडीदार जर सरकारी नोकरी करणारा असेल, तर रंग, रूपाचाही विचार केला जात नाही. त्यामुळे हल्ली अनेक तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळणे मुश्कील झाले आहे. लग्नाचे वय जवळ आले तरी तरुणांची घर, नोकरीसाठी धडपड सुरू असते. पण, अनेक प्रयत्न करूनही सरकारी नोकरी सोडाच; पण अनेक स्वप्नंही अपुरी रहतात. त्यात घरातील कर्ता मुलगा असेल, तर कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडते. पण, या सर्व गोष्टींत जेव्हा लग्नाचा विषय येतो, तेव्हा मुली मुलाच्या इतर सर्व गोष्टींपेक्षा फक्त तो नोकरी काय आणि किती पगाराची करतो हे आधी पाहतात. या परिस्थितीवरून आता तरुणांची बाजू मांडणारे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जे तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल.

हल्लीची अशी स्थिती आहे की, लोकांना सरकारी सेवा-सुविधांचा लाभ घेताना कमीपणाचं वाटतं. त्यातही विशेषत: सरकारी शाळा, सरकारी रुग्णालयात जाणं लोक टाळतात. कारण- यावरून आपलं समाजातील स्थान ठरवलं जाईल, असं समजतात. त्यामुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलो तरी चालेल; पण मुलाचा चांगल्या खासगी शाळेत प्रवेश घेतात. तसेच आजारी पडल्यानंतरही सरकारी नाही, तर थेट खासगी रुग्णालयात नेतात. पण, याच सर्वांवर बोट ठेवत, एका तरुणीनं वयात आलेल्या तरुणांची बाजू मांडणारं पोस्टर झळकवलं आहे आणि त्यावर लिहिलेला मजकूर प्रत्येकालाच विचार करायला भाग पाडणारा आहे. हे पोस्टर आता खूपच चर्चेचा विषय ठरलं आहे.

या व्हायरल फोटोत तरुणीनं पोस्टरवर लिहिलं आहे की, सरकारी शाळा नको, सरकारी बस नको, सरकारी दवाखाना नको; पण नवरा मात्र सरकारी नोकरीवाला पाहिजे, वा…रे…दुनिया…! हे पोस्टर @pallavi_chopade_patil नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलं आहे.

“मराठीनंतर उर्दूला अभिजात भाषेचा दर्जा द्या” उद्धव ठाकरेंची मागणी? पोस्ट व्हायरल; कॉल करताच समजलं सत्य…

अनेकांना हे पोस्टर आवडलं असून, त्यावर शेकडो युजर्सनी कमेंट्स केल्या आहेत. एका युजरनं लिहिलं, “ताई, तू हे पोस्टर दाखवून लाखो मुलांची मनं जिंकलीस…” दुसऱ्या युजरनं लिहिलं, “खूपच भारी हे फक्त वाचायला छान वाटतं; पण परिस्थिती खूप वाईट आहे सध्या… तिसऱ्या युजरनं लिहिलं, “खरंच ताई, हे पोस्टर दाखवून, तू आम्हा मुलांच्या भावना समजून घेतल्यास. मुलांची मनं जिंकलीस. ताई, तू ग्रेट आहेस.” चौथ्या युजरनं लिहिलं, “आई-बाबांची आणि साईबाबांची शपथ मनातलं बोललीस तू.” शेवटी एका युजरनं लिहिलं, “हो ना ताई, हे खरंच आहे; पण काय करणार? हा काळच वेगळा आहे. इथे फक्त सरकारी नोकरीवाला पाहिजे; मग तो कसाही असला तरी काही हरकत नाही…”