Viral Video Of Students : शाळेतील मित्र-मैत्रिणी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून जाते नाही का? त्यामुळे शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येते. आजारी पडल्यावर या बाकावर डोकं ठेवून झोपणे, मधल्या सुट्टीत सगळ्यांनी एकत्र डब्बा खाणे, मित्र-मैत्रिणींची नावे बाकावर कोरणे ते अगदी मधल्या सुट्टीच्या किंवा शिक्षक वर्गात नसताना ढोल ताशाप्रमाणे बाकं वाजवणे आदी अनेक आठवणी या लाकडी बाकांशी जोडलेल्या असतात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ (Video) व्हायरल होतो आहे, ज्यामध्ये शाळेतील मुलांनी अनमोल क्षण शिक्षिकेला अनुभवायला दिला आहे.
पुण्यात शिक्षिकेने बर्याच शाळांमधून शेवटचे सत्र घेतले. शिक्षिका जेव्हा पुढच्या वर्षी भेटू असे सांगते तेव्हा तिला दरवर्षीच वेगवेगळे अनुभव येतात. मुले अचानक शांत होतात, मिठ्या मारतात, रडतात, त्यांचे फोन नंबर घेतात, वाकून नमस्कार करतात, हे सगळ्याच शाळांमध्ये घडत असते. पण, काही शाळांमधले विद्यार्थी हट्टच धरतात की आता तुम्ही येणार नाही त्यामुळे आम्हाला आजच तुम्हाला डान्स करून दाखवायचा आहे, ढोल ताशा दाखवायचा आहे किंवा भाषण, कविता, ऐकवायची आहे. त्यांच्या या गोड हट्टापुढे त्यांच्या शिक्षकांनाही मान हलवावी लागते आणि मग असे काही अनमोल क्षण हाती लागतात. तर नक्की विद्यार्थ्यांनी काय केले व्हायरल व्हिडीओतून (Video) बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की साधी कंपासपेटी, बेंच आणि चक्क पाण्याची बाटली वाजवून ढोल ताशाचा फिल विद्यार्थ्यांनी वर्गात दिला आहे. वर्गातील काही मुले पॅशनेटली (passionately) ढोल ताशा वाजवत आहेत. त्यांच्या अंगात तो ताल, लयसुद्धा जाणवतो आहे आणि संपूर्ण वर्ग त्यात रमला आहे. त्यामुळे कितीही वेळा तो व्हिडीओ (Video) बघितला तरी त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघून प्रत्येक वेळी तुम्हालाही तितकाच आनंद होईल आणि तुम्हीसुद्धा शाळेच्या जुन्या आठवणींमध्ये रमून जाल एवढे तर नक्की…
काय मजा होती राव…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @projectasmi_pune इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच शिक्षिकेने हा अनुभव कॅप्शनमध्ये लिहिला आहे आणि हे पाहून “आजका तो दिन बन गया यार” असे वाटतेय असेसुद्धा आवर्जून लिहिले आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी ‘अरे यांना शिक्षकांसमोर करायला मिळतंय, आम्हाला तर लपून लपून बाक वाजवायला लागायचा, काय मजा होती राव, मुलांना व्यवस्थित त्या त्या क्षेत्रात वेळीच प्रशिक्षण द्यायला हवे’; आदी अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.