भारतातील प्रसिद्ध उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे रतन टाटा हे आपल्या समाजकार्यामुळे जास्त चर्चेत असतात. प्रत्येक भारतीयाच्या मनात रतन टाटांविषयी विशेष आदर आहे. रतन टाटा यांनी आतापर्यंत अनेक स्टार्टअप्सना आर्थिक पाठबळ दिलंय. आणि हे स्टार्टअप्स आता आपापल्या क्षेत्रात आघाडीवरही आहेत. रतन टाटा यांनी टाटा ग्रुपला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. बिजनेसच्या क्षेत्रात टाटा यांनी खूप नाव कमावलं पण प्रेमाच्या बाबतीत मात्र त्यांना यश मिळालं नाही. कामाप्रती एकनिष्ठ असणाऱ्या रतन टाटांनी लग्न केलेलं नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांना कधी प्रेम झालंच नाही. एका इंटरव्ह्यूमध्ये स्वतः रतन टाटा यांनी याबद्दल उल्लेख केला आहे. एक दोन नाही तर तब्बल ४ वेळा त्यांना प्रेमाचा अनुभव येऊन गेला आहे. परंतु त्यांना त्यांचं प्रेम लग्नापर्यंत पोहचवता आलं नाही.

एका इंटरव्ह्यूमध्ये रतन टाटा यांनी सांगितलं की त्यांना प्रेम झालं होतं पण ते त्यांच्या प्रेयसीसोबत लग्न करू शकले नाहीत. त्यांनी सांगितलं, ‘भविष्याचा विचार करता अविवाहित राहणं त्यांच्यासाठी योग्य ठरलं. कारण जर त्यांनी लग्न केलं असतं तर परिस्थिती फारच जटिल झाली असती.’ रतन टाटा यांनी ४ वेळा लग्नाचा गंभीरपणे विचार केला. मात्र कोणत्या ना कोणत्या भीतीने ते मागे पुन्हा आले. जेव्हा ते अमेरिकेत काम करत होते तेव्हा ते प्रेमाच्या बाबतीत फारच गंभीर होते. पण रतन टाटा पुन्हा भारतात आले म्हणून ते त्यांच्या प्रेयसी सोबत लग्न करू शकले नाहीत.

रतन टाटा यांची प्रेयसी भारतात यायला तयार नव्हती. त्यावेळी भारत-चीन युद्ध देखील सुरु होते. शेवटी त्यांच्या प्रेयसीने अमेरिकेतच दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न केलं. .यानंतर रतन टाटा यांनी आपल्या प्रेयसीबद्दल पुढे सांगण्यास नकार दिला. रतन टाटा यांचा जन्म एका समृद्ध कुटुंबात झाला परंतु त्यांचं आयुष्य मात्र इतकं सहज नव्हतं. रतन टाटा अवघे ७ वर्षांचे असताना त्यांचे आईवडील विभक्त झाले. यानंतर त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला.

भारत सरकारने रतन टाटा यांना देशाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे. २००० साली त्यांना पद्मभूषण तर २००८ साली पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं.

Story img Loader