खरे तर हा विषय किमान शंभर वर्षे जुना. शब्दप्रभू राम गणेश गडकरी यांचा मृत्यू २३ जानेवारी १९१९ रोजी झाला, त्याहीआधी गडकरींनी ‘नाटक कसे पाहावे’ या शीर्षकाचे स्फुटलेखन केले आणि त्यांच्या ‘संपूर्ण बाळकराम’ या पुस्तकात ते वाचताही येते. त्याची आत्ताच आठवण यावयाचे कारण असे की, एकापाठोपाठ तिघा मराठी नाटय़कलावंतांनी एकाच विषयाला वाचा फोडली आहे. मोबाइलची घंटा वाजत असल्यास एक तर प्रेक्षकांनी नाटक पाहू नये किंवा आम्ही नाटय़प्रयोग करू नये, असे या तिघांचे म्हणणे. हे तिघेही केवळ मराठी रंगकर्मीच नसून चित्रवाणी मालिका, चित्रपट यांमध्येही या तिघांचा संचार असल्याने, शिवाय हे तिघे हल्लीच्या मनोरंजन-उद्योगातील एकाच मातबर संस्थेशी संबंधित असल्याने त्यांच्या म्हणण्याची चर्चा अधिक. अभिनेता भरत जाधव यांनी याआधी याच विषयाला वाचा फोडली होती; पण त्या तुलनेत सुमित राघवन, चिन्मय मांडलेकर आणि सुबोध भावे यांनी फोडलेल्या वाचेची चर्चा अधिक. चर्चा तर होणारच म्हटले, तरी ती साधकबाधक असावी, म्हणून दोन्ही बाजूंचे लोक सरसावणारच. तेव्हा ‘नाटक कसे पाहावे’ याचे राम गणेश गडकरी ऊर्फ गोविंदाग्रज ऊर्फ बाळकराम यांच्यानंतर या चर्चेच्या एका बाजूस शतकभराने सापडलेले उत्तर असे की, मोबाइलचा आवाज न करता नाटक पाहावे.

वाद या उत्तराच्या तपशिलाबद्दल आहे. मोबाइल बंद ठेवावा की मूक-गतीने (पक्षी : सायलेंट मोडवर) तो सुरू ठेवावा, याविषयी वाद आहे. ‘बंद’ गट आणि ‘मूक-गती’ गट या दोन्ही गटांतील लोक आपलाच मुद्दा योग्य, असे हिरिरीने मांडत आहेत. बंद गटाचे म्हणणे असे की, आपण नाटक पाहावयास स्वेच्छेने जातो, तेथे चार घटका आपली सुखदु:खे विसरावीत असे आपल्याला वाटत असते, तेव्हा काही काळ जगापासून दूर जाण्यास काय हरकत आहे? याउलट मूक-गती गटाचे म्हणणे असे की, सुखदु:खे विसरणे वगैरे जुन्या काळात ठीक होते आणि आजच्या काळात जगापासून चार घटका दूर जाणे शक्य नाही.. फार तर, आम्ही आमच्या मोबाइलच्या आवाजाचा त्रास इतर प्रेक्षकांना आणि रंगभूमीवरील पात्रांना होणार नाही इतकी काळजी घेऊ.

वरवर पाहता, हा वाद इतका काही विकोपाचा नाही असे वाटेल. एकतर, रंगकर्मीना वा इतर प्रेक्षकांना त्रास होऊ नये, हे दोन्ही गटांना मान्यच आहे! शिवाय तिकीट काढून, नामवंत रंगकर्मीची नाटके हल्ली किती जण पाहतात? वर्षभराची सरासरी काढल्यास, ११.४२ कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात हे प्रमाण दिवसाला फार फार तर पाच-सहा हजारांवर जाईल. म्हणजे अर्ध्या टक्क्याहूनही खूऽऽपच कमी! मग या तुरळकांच्या वादाला दैनंदिन जीवनात महत्त्व ते किती?

हे महत्त्व इथे सांगितलेच पाहिजे. नाटय़गृहात नाटक पाहणारे भले कमी असतील, तुरळक असतील. पण आजचा काळ असा की, नाटक कुठे घडत असेल हे सांगता येत नाही. किंवा जे घडते आहे ते नाटक नाहीच अशी आपणांस खात्री असली तरी, ही खात्री खरीच असेल, असे नाही. मोबाइलचे केवळ निमित्त.. इतरांना त्रास द्यायचा नसल्यास आपण ‘बंद’ राहायचे की ‘मूक-गती’ने राहायचे, हे प्रत्येकाने ठरवणे आजच्या काळात आवश्यकच आहे.. तरच ‘नाटक कसे पाहावे’ याचे कालोचित उत्तर मिळेल.