घरपोच ऑनलाइन दारू पोहचवण्याच्या गेल्या दोन दिवसांतील घडामोडीवर उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपा सरकारच्या या निर्णयावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीच्या प्रचारावेळी घरपोच दारूचे अश्वासन दिले नव्हते. त्यांनी सगळय़ांना अन्न-वस्त्र- निवारा व ‘नीतिमान भारता’चे वचन दिले होते अशी राज्य सरकारची कानउघडणी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.

‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून शिवसेनेने मुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य केले आहे. घरपोच दारूच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी सामनातून सरकारची चांगलीच कानउघडणी केली आहे. सरकारने निर्णयच घेतला नव्हता तर उत्पादन शुल्क मंत्र्यांनी घरपोच दारू पोहोचविण्याच्या प्रस्तावाबाबत सरकार सकारात्मक आहे असे का म्हटले होते? तिकडे मुख्यमंत्रीही म्हणतात, निर्णय घेतलेला नाही, घेणारही नाही. मग त्याविषयीच्या बातम्या आधी का दिल्या, हा प्रश्न उरतोच. म्हणजे खडा टाकून बघायचा. लागला तर लागला! आता तुम्ही कितीही सारवासारव केली तरी तुमचा खरा चेहरा पुन्हा उघड झालाच आहे. (शराब के) ‘बूँदसे गयी वो हौदसे नहीं आती’ हे लक्षात आले असेलच. असाही टोला लगावला आहे.

काय म्हटले आहे सामनामध्ये?

विद्यमान सरकारने घरोघरी ‘बार’ उघडण्याचा परवाना देऊन ‘क्रांतिकारक’ पाऊल टाकले. घरोघरी दारू पोहोचवू व लोकांना अशा प्रकारे धुंद करू असे वचन पंतप्रधान मोदी यांनी निवडणूकपूर्व भाषणात दिले नव्हते. त्यांनी सगळय़ांना अन्न-वस्त्र- निवारा व ‘नीतिमान भारता’चे वचन दिले, पण महिलांशी अनैतिक वागणारे मंत्रिमंडळात आहेत आणि नशेबाजांना उत्तेजन देणारे निर्णय घेतले जात आहेत. हे सर्व कशासाठी, तर म्हणे ‘ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह’ रोखण्यासाठी. लोकांनी दारू पिऊन गाडी चालवून अपघातांना निमंत्रण देऊ नये, घरीच दारू पिऊन जीवनाची नासाडी करावी यासाठी हा नवा फंडा. दुसरे कारण असे सांगण्यात येते की, बनावट दारू रोखण्यासाठी हा निर्णय होत आहे. थोडक्यात, महाराष्ट्रात पाण्याचा दुष्काळ पडला आहे हे तर माहीत आहे, पण अकलेचा दुष्काळ पडला आहे की काय, अशी शंका यावी असा सगळा हा प्रकार आहे. घरी दारू पिऊन लोक गाडय़ा चालवणार नाहीत याची गॅरंटी काय? मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला तो भ्रष्टाचार, काळा पैसा व बनावट नोटा रोखण्यासाठी, पण उलट बनावट नोटांचा आणि भ्रष्टाचाराचा सुळसुळाट घाऊक पद्धतीने वाढल आहे.