लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : आरती यादव हत्या प्रकरणातील आरोपी रोहीत पाल याची गुरूवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्या पालकांचा पोलिसांना शोध लावला आहे. १२ वर्षांपूर्वी रोहीत पाल उत्तरप्रदेशाततील आपल्या घरातून पळून गेला होता. त्याने बनावट आधारकार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे आपली दुसरी वेगळी ओळख निर्माण केली होती.

वसईतील आरती यादव (२२) या तरुणीची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती. तिचा मारेकरी रोहीत याने आपले नाव रोहीत यादव असून मूळ गाव राजस्थानमधील असल्याचे सांगितले होते. अनाथ असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले होते. मात्र पोलिसांना त्यावर विश्वास नव्हता. पोलिसांनी त्याच्या पालकांचा शोध सुरू केला.

आणखी वाचा-मिरा-भाईंदरमधील अनधिकृत बारवरील कारवाईस सुरुवात

हरवलेल्या व्यक्तींसाठी असलेल्या भारत शासनाच्या संकेतस्थळावर त्याचे छायाचित्र टाकले तेव्हा गाझियाबाद मध्ये तो बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पालकांनी केल्याचे समजले. रोहीत पाल याने १२ वर्षांपूर्वी आपले घर सोडले होते. त्याला आई वडील आणि दोन बहिणी आहेत. मात्र तो नालासोपार्‍यात रोहीत पाल बनून रहात होता. त्यासाठी त्याने बनावट कागदपत्रेही तयार केली होती. पोलिस कागदपत्रांची चाचपणी करत आहेत.

गुरूवारी रोहितच्या वाढीव पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला वसईच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. तेव्हा त्याची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.