भाईंदर : जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनानिमित्त मिरा भाईंदर महापालिकेने शनिवारी उत्तनच्या समुद्र किनाऱ्यावर महास्वच्छता मोहीम राबवली. यावेळी जवळपास ३ हजार नागरिकांनी सहभाग घेतला होता. या मोहिमेत ३७ टन कचरा जमा करण्यात आला.

मिरा भाईंदर शहराच्या स्वच्छतेत भर पाडावी म्हणून महापालिकेने जागतिक किनारा स्वच्छाता दिनाचे औचित्य साधून शनिवारी उत्तनच्या वेलंकनी आणि भाटेबंदर या किनाऱ्यावर मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमेत ११ सामाजिक संस्था, १० महाविद्यालये आणि ९ शाळेचे विद्यार्थी तसेच महापालिकेचे कर्मचारी अधिकारी मिळून ३ हजार जण सहभागी झाले होते. यामुळे दुपारपर्यंत वेलंकनी किनाऱ्यावरून १५ टन आणि भाटेबंदर (उत्तन ) किनाऱ्यावरून २२.५ टन असा एकूण ३७ टन कचरा संकलित करण्यात आला.

हेही वाचा – तिकीट निरीक्षकाला प्रवाशाकडून हॉकीस्टिकने मारहाण, नालासोपारा स्थानकातील घटना

हेही वाचा – वसई विरार महापालिकेची समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम १३ हजार नागरिकांचा सहभाग, ५१ टन कचरा संकलित

मिरा भाईंदर शहरातल्या नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती व्हावी, शहरे आणि समुद्र किनारे प्लास्टिक कचरा मुक्त व्हावा यासाठी हे ‘मेगा बीच क्लीनअप’ उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त संजय काटकर यांनी सांगितले. सदर कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त अनिकेत मनोरकर, उपायुक्त डॉ. सचिन बांगर उपायुक्त संजय दोंदे यांच्यासह मिरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी आणि सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी मिस अर्थ असलेली गौरी घोटणकर आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध गायक कुणाल पंडित देखील हजर होते.