एक किलोमीटर परिघातील १४00 कोंबडय़ांची विल्हेवाट विरार : शुक्रवारी विरारच्या अर्नाळा-आगाशी भागातील कोंबडय़ांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे उघड होताच जिल्हा पशुसंवर्धन विभागाने शनिवारी या परिसरात शोधमोहीम रावबून एक किलोमीटर परिघातील १४०० कोंबडय़ा नष्ट केल्या. वसईत बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. तर दुसरीकडे त्याचा फैलाव होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागाने प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे. गेल्या आठवडय़ापासून विरारमधील अर्नाळा, आगाशी, बोळिंज परिसरातील काही भागांत अचानक कोंबडय़ांचा मृत्यू झाला होता. जिल्हा पशुसंवर्धन विभागाने मृत कोंबडय़ाचे नमुने केंद्रीय प्रयोगशाळेत पाठवले असता कोंबडय़ांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे शनिवारी अर्नाळा आणि आगाशी परिसरात जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी, पुणे वैद्यकीय शाळेचे अधिकाऱ्यांचे पथक आणि अर्नाळा ग्रामपंचायतीने ही शोधमोहीम राबवली. बर्ड फ्लूची लागण झालेल्या एक किलोमीटर परिघातील कुक्कुटपालन केंद्रांतून १४०० कोंबडय़ा ताब्यात घेऊन त्यांची पुरापाडा येथील डंपिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावण्यात आल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कांबळे यांनी दिली.