लोकसत्ता वार्ताहर

भाईंदर : बनावट मृत्यू दाखला तयार करून एका कुटुंबियाने विविध विमा कंपनीकडून जवळपास ७० लाख रुपये उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. याबाबत भाईंदर पोलिसांनी एका डॉक्टरसह पै कुटुंबातील चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भाईंदरच्या राई गावात राहणाऱ्या पै कुटुंबीयानी आयासीआयसीआय लाईट इन्शुरन्स,मॅक्स लाईफ, भारतीय एक्स, फ्युचर जर्नल आणि एचडीएफसी इन्शुरन्स अशा विविध कंपनीकडून जीवनविमा काढला होता. कंपनीकडून पैसे उकळण्यासाठी त्यांनी चक्क कांचन पै ही महिला मयत झाली असल्याचा बनाव रचला. तिच्या मृत्यूच्या दाखला तयार करण्यासाठी ओळखीच्याच डॉक्टर आशुतोष यादव यांची मदत घेऊन कागदपत्रे तयार केली. या कागदपत्राच्या आधारे त्यांनी विविध कंपनीकडे एकूण १ कोटी १० लाखाचा दावा देखील केला.यातील एकूण ६९ लाख ६० हजाराची रक्कम त्यांना मिळाली. उर्वरित रक्कमही त्यांना मिळणार होती.

आणखी वाचा-महावितरणाच्या उघड्या डीपी मुळे चिमुकल्याचा मृत्यू

दरम्यान कागदपत्राची पडताळणी करत असताना बनावट कागदपत्रे असल्याची बाब एका विमा कंपनीच्या निदर्शनात ही बाब आली. त्यामुळे कंपनीकडून या संदर्भात भाईंदर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती.

त्यानुसार पोलीस भाईंदर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिंदे यांनी केलेल्या तपासात पै कुटुंबियांनी विविध कंपनीलाठिकाणाचे बनावट मृत्यू दाखले दिले असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणात कांचन रोहित पै, रोहित पै, धनराज पै यांच्यासह बनावट दाखला देणारा डॉक्टर आशुतोष यादव विरोधात कलम ४२०,४६५,४६७,४६८,४७१ आणि १२०(बी )अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारही आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.