वसई- मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील बोळींज या १९ व्या पोलीस ठाण्याचे उदघाटन शुक्रवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे झाले. अर्नाळा सागरी आणि विरार पोलीस ठाण्याचे विभाजन करून हे पोलीस ठाणे तयार करण्यात आले आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाची स्थापना १ ऑक्टोबर २०२० रोजी झाली होती. नव्या आयुक्तालयात एकूण २० पोलीस ठाण्याची रचना करून शहरात ३ परिमंडळे तयार करण्यात आली होती.

वसई विरार शहरात मांडवी, पेल्हार, बोळींज, आचोळे आणि नायगाव तर मिरा भाईंदर मध्ये काशिगाव आदी ६ नवीन पोलीस ठाणे प्रस्तावित करण्यात आली होती. यापैकी आचोळे, पेल्हार, मांडवी, नायगाव आणि काशिगाव ही ५ पोलीस ठाणी तयार झाली होती. पंरतु बोळींज पोलीस ठाणे जागेअभावी रखलडले होते. अखेर जुलै महिन्यात बोळींज पोलीस ठाण्याची अधिसूचना काढण्यात आली आणि विरार पश्चिमेच्या म्हाडा येथील इमारतीत पोलीस ठाण्याला जागा देण्यात आली. मागील साडेतीन महिन्यात पोलीस ठाण्याच्या निर्मितीचे काम पूर्ण करण्यात आले. राजेंद्र तेंडुलकर यांची वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

हेही वाचा >>> भाईंदर : नया नगर पोलीस ठाण्याबाहेर रक्तरंजित थरार; भररस्त्यात महिलेची पतीकडून हत्या

शुक्रवारी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्याहून दुरदृश्यप्रणालीद्वारे या पोलीस ठाण्याचे उद्घटन केले. यावेळी विरार मध्ये आयोजित कार्यक्रमात वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, खासदार हेमंत सवरा, आयुक्त मधुकर पांडे, पालिका आयुक्त अनिलकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, पुर्णीमी श्रींगी- चौगुले आदी उपस्थित होते. यावेळी नालासोपार्‍याच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या नवीन इमारतीचे देखील उद्घघाटन करण्यात आले.

पोलीस आयुक्तालय सुरू झाले तेव्हा २ हजार पदे होती. मागील वर्षी १ हजार पदे भरली आहेत. नुकताच १ हजार ०८२ पदांना मंजूरी मिळाली आहे, असे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी यावेळी सांगितले.

लहान मुलांवर लैंगिक अत्याचार होत आहेत. शाळा महाविद्यालयात पोलिसांनी अधिक लक्ष द्यावे, वाढते  सायबर गुन्हे लक्षात घेता जनजागृती करावी असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी यावेळी सांगितले. या नव्या पोलीस ठाण्याजवळील रस्ता रुंद करावा अशी सुचना त्यांनी आयुक्तांना केली.खासदार हेमंत सवरा यांनी देखील यावेळी सायबर गुनह्यांबाबत जनजागृतीची गरज व्यक्त केली.

हेही वाचा >>> शहरातील धूळ प्रदूषणावर मात्रा; वसई विरार महापालिकेची ‘फॉग कॅनन’ यंत्रणा लवकरच कार्यरत

बोळींज पोलीस ठाण्याची अधिसूचना जुलै महिन्यात काढण्यात आली. तेव्हा वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र तेंडुलकर आणि पोलीस उपनिरीक्षक विष्णू वाघमोडे या दोघांची नियुक्ती करण्यात आली होती. जागेचा शोध घेण्यापासून पोलीस ठाण्याची सजावट या दोन अधिकार्‍यांनी केली. शुक्रवारी उद्घटनानंतर इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली

बोळींज पोलीस स्टेशनची ही आहे हद्द

विरार पश्चिम रेल्वे स्थानक परिसर ते संपूर्ण बोळींज , म्हाडा संकुल परिसर , ग्लोबल सिटी , विराट नगर , यशवंत नगर , तिरुपती नगर , गोकुळ टाऊनशिप , वायके नगर , एमबी इस्टेट , नारिंगी गाव , चिखलडोंगरी , मारंबळपाडा हे भाग आता बोळींज पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणार आहे. त्यासाठी पोलीस स्टेशनची अधिकृत हद्द निश्चिती पूर्ण झाली आहे.