विरार जवळील अर्नाळा समुद्र किनारी गुरुवारी अचानकपणे मोठ्या प्रमाणात तारली मासे हे चक्क समुद्र किनाऱ्यावर आले आहेत. ते मासे पकडण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाली आहे.
हेही वाचा- वसई-विरारला नवा साज; शहराच्या सौंदर्यीकरणास सुरुवात, भित्तिका रंगकाम, कारंज्यांची भर
विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा समुद्र किनारा परिसर आहे. या भागातील मोठ्या संख्येने मच्छीमार बांधव राहत आहे. एरवी खोल समुद्रात जाऊन त्यांना मासेमारी करून त्यावर आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवारी अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात तारली मासळीच्या प्रजाती या किनाऱ्यावर आल्याचे चित्र दिसून आले. ही मासळी अगदी एक ते दीड फूट खोल इतक्या पाण्याजवळच असल्याने हे मासे पकडण्यासाठी मच्छीमार बांधवांची झुंबड उडाली होती.
हेही वाचा- वसई, विरार शहरात बेकायदा इंटरनेटचे जाळे
इतर वेळी मासे पडण्यासाठी जाळे घेऊन जावे लागते आता मासळी एकदम हाताजवळच असल्याने सहज हाताने पकडली जात आहे. पोत, टोपली, पिशवी हे काही हाती मिळेल ते घेऊन मासळी पकडण्यासाठी नागरिक समुद्र किनारी धावा घेत आहेत. अचानकपणे इतक्या मोठ्या प्रमाणात मासे समुद्र किनारी आल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याआधी सुनामी आली होती त्यावेळी असा प्रकार घडला होता असे येथील नागरिकाने सांगितले आहे.