मयूर ठाकूर

भाईंदर : यंदा मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नववी आणि तिसरीच्या विद्यार्थ्यांकरिता सेमी इंग्रजीचे वर्ग नव्याने सुरू करण्यात येत आहेत. मात्र अध्र्याहून अधिक शैक्षणिक वर्ष संपले तरी शाळेत पुरेशा शिक्षकांची भरतीच झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.मीरा-भाईंदर पालिकेच्या शाळा आठवीपर्यंत होत्या. ते वर्ग वाढवण्याचा तसेच या शाळांमध्येही सेमी इंग्रजी वर्ग सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. त्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून पेणकर पाडा, काशीगाव आणि माशाचा पाडा या तीन मराठी शाळांत तसेच मीरा रोडच्या एका उर्दू शाळेत नववीचे वर्ग नव्याने सुरू करण्यात आले आहेत. येथे मिळून २८५ विद्यार्थी शिकतात. मात्र त्यांच्यासाठी पुरेसे शिक्षकच उपलब्ध नाहीत. विज्ञान आणि गणितासाठी पुरेसे शिक्षक नाहीत.

पालिका पहिल्या प्रस्तावानुसार एकूण ४५ शिक्षकांची भरती करेल, असे ठरले होते. मात्र प्रत्यक्षात ३८ शिक्षकांसाठीची जाहिरात प्रसिद्ध केली. मात्र त्याचे पुढे काय झाले ते कळलेलेच नाही. परिणामी सहामाही परीक्षा तोंडावर आली तरीही विद्यार्थ्यांना शिक्षकच मिळालेले नाहीत. पालिकेच्या वर्गात शिक्षकांचाच पट कमी असण्याची नामुष्की आली आहे.

अंतर्गत बदल्यांचे गौडबंगाल
मीरा-भाईंदर महानगरपालिका शाळेत गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षकांच्या बदल्या न झाल्यामुळे अनेक शिक्षक हे सुरुवातीपासून एकाच शाळेत कार्यरत होते. अशा ८४ शिक्षकांचा अहवाल तयार करून त्यांचे बदलीचे आदेश आयुक्त ढोले यांनी काढले आहेत. या आदेशामुळे शिक्षकवर्गात नाराजी आहे. बदली थांबवण्यासाठी अनेक शिक्षक धडपड करत आहेत.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेने नव्या ४४ शिक्षकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची निवड प्रक्रिया सुरू आहे. पुढील आठवडय़ात या नव्या शिक्षकांकडे जबाबदारी देण्यात येईल. – दिलीप ढोले, मीरा-भाईंदर महापालिका आयुक्त