वसई: विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने राजकीय घडामोडींना ही वेग आला आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष राजीव पाटील यांनी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर त्यांच्यासोबत बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील हे सुद्धा भाजप मधील जातील अशी चर्चा रंगली आहे.

मात्र राजेश पाटील यांनी आपण बहुजन विकास आघाडी सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.त्यामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष आणि वसई विरार महापालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांनी भाजप मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या निर्णयामुळे वसई विरार शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

हेही वाचा >>> वसई : राजीव पाटील यांच्यावर अन्याय नाही; बविआचा दावा, ताकदीने निवडणूक लढवणार

त्यांच्या सोबत बहुजन विकास आघाडीतील प्रमुख नेते व पदाधिकारी जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात रंगली आहे.विशेषतः बोईसर विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पाटील हे सुद्धा राजीव पाटील यांच्या सोबत जाणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आमदार राजेश पाटील हे २०१९ च्या निवडणुकीत बोईसर मतदार संघातून निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर ते खचून न जाता पुन्हा एकदा आमदारकीच्या तयारीला लागले आहेत.

हेही वाचा >>> वसई: राजीव पाटील यांचा भाजप मधील प्रवेश निश्चित

असे असतानाच आता बहुजन विकास आघाडीचे कार्याध्यक्ष हे राजीव पाटील हे भाजप मध्ये जाणार असल्याने त्यांच्या जोडीला आमदार राजेश पाटील हे जाणार असल्याची चर्चा सुरू झाली. याशिवाय  राजेश पाटील हे राजीव पाटील यांच्या अधिक जवळचे असल्याने त्यांच्या सोबत जातील असेही बोलले जाऊ लागले आहे.जर राजेश पाटील गेले तर बविआला आणखीन एक मोठा धक्का बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मात्र सुरू असलेल्या चर्चेवर खुद्द राजेश पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माझी राजकीय जडणघडण ही बहुजन विकास आघाडीत झाली आहे.त्यामुळे मी आमदार हितेंद्र ठाकूर व बहुजन विकास आघाडी सोडून कुठेही जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मी राजीव पाटील यांच्या सोबत जाणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. अशा अफवांवर विश्वास ठेवू नका मी शेवटच्या श्वासापर्यंत बहुजन विकास आघाडी सोबतच राहीन असे राजेश पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे राजेश पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.