वसई – बॉम्बस्फोट प्रकरणी जामीन मंजूर झालेला ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’चा कार्यकर्ता वैभव राऊत गुरुवारी रात्री उशिरा नालासोपारा येथील घरी परतला. यावेळी त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. मागील ५ वर्षांपासून तो तुरुंगात होता.

ऑगस्ट २०१८ मध्ये महाराष्ट्र दहशतवात विरोधी पथकाने ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’चा कार्यकर्ता वैभव राऊत याला नालासोपाऱ्यातील घरातून अटक केली होती. वैभव राऊतच्या घरातून ८ बॉम्ब आणि गोदामातून १२ बॉम्ब जप्त करण्यात आले होते. याशिवाय त्याच्याकडून एक डायरीही जप्त करण्यात आली होती. या डायरीत आरोपीचं हल्ल्याचं नियोजन आणि बॉम्ब तयार करण्याविषयीची तपशीलवार माहिती होती. पुण्यातील सनबर्न फेस्टीव्हलवर हल्ला करण्यासाठी बॉम्ब तयार केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. मागील ५ वर्षांपासून तो तुरुंगात होता. मुंबई उच्च न्यायालयाने न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि गौरी गोडसे यांच्या खंडपीठाने आरोपी वैभव राऊतला जामीन मंजूर केला होता.

हेही वाचा – वसई : मीरा रोडमध्ये काशिगाव या नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती होणार, आयुक्तालयातील हे १८ वे पोलीस ठाणे

हेही वाचा – सावधान! नायजेरियन भामट्यांची फसवणुकीची नवीन पद्धत, विवाहविषयक संकेतस्थळांवर भारतीय बनून मुलींची फसवणूक

वैभव राऊतला जामीन मिळाल्याचे वृत्त आल्यापासूनच नालासोपारा पश्चिमेच्या सोपारा गावातील भंडार आळीत उत्साहाचे वातावरण होते. त्याच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. गुरुवारी तो घरी येणार असल्याने हजारोंच्या संख्येने ग्रामस्थ उभे होते. ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी करून त्याचे स्वागत करण्यात आले. वैभवने हातात भगवा झेंडा फडकावत जामीन मिळाल्याचा जल्लोष साजरा केला.

Story img Loader