आरोग्य, शिक्षण, संरक्षण, रोजगाराकडे शासनाचे दुर्लक्ष

कल्पेश भोईर

वसई :  मागील दोन वर्षांपासून असलेले करोनाचे संकट, अवकाळी पाऊस यामुळे पालघर जिल्ह्यातील स्थलांतरित मजुरांच्या रोजगाराचा प्रश्न अधिक बिकट बनला आहे. मात्र मागील दीड ते दोन वर्षांपासून ही कुटुंबं यातना भोगत आहेत. ग्रामीण भागात भात शेती जरी उपलब्ध असली तरी तेथील जवळच्या भागात रोजगाराची कोणतीही साधने नाहीत.   पालघर जिल्ह्यातील वाडा ,विक्रमगड, चारोटी, तलासरी, डहाणू , जव्हार, मोखाडा यासह इतर खेडय़ापाडय़ातील मोठय़ा संख्येने मजूर रोजंदारीसाठी वसईच्या शहरी भागाच्या ठिकाणी स्थलांतर करून येतात.  हाताला मिळेल ते काम करून ते आपला उदरनिर्वाह करू लागले आहेत.  उघडय़ावरच अशी कुटुंब राहत असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून करोनाचे संकट, अवकाळी पाऊस अशा विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत.  शासनाने अशा स्थलांतर करून जाणाऱ्या कुटुंबाकडे लक्ष देणे गरजेचे असून त्यांना आवश्यक असलेल्या मूलभूत गरजा त्यांचे आरोग्य, शिक्षण, संरक्षण अशा विविध बाबी पुरविणे गरजेचे आहे.  नुकताच काही दिवसांपूर्वी वसईत कामासाठी स्थलांतरीत होऊन आलेल्या महिलांना चोर समजून मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. याआधीही विनयभंग, मारहाण, दमदाटी अशा घटना घडल्या आहेत. जर अशा अन्यायकारक घटना घडत राहिल्या तर अशा कुटुंबांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.

निवारा केंद्राची सुविधा हवी

पालघर जिल्ह्यतून मोठय़ा संख्येने नागरिक हे रोजगारासाठी स्थलांतर करून येत असतात. अशा नागरिकांना उघडय़ावरच संसार मांडून राहावे लागत आहे. ऊन, वारा, पाऊस , थंडी अशा विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. जर अशा स्थलांतर करून येणाऱ्या नागरिकांना शहरी भागाच्या जर तात्पुरता स्वरूपात निवारा केंद्र उभारणे आवश्यक आहे. जर निवारा केंद्र असतील तर या नागरिकांना ही त्यात राहून आपले जीवन चांगल्या प्रकारे जगू शकतात असे नागरिकांनी सांगितले आहे.

स्थलांतरित मुलांच्या शिक्षणावरही परिणाम

रोजंदारीसाठी अनेक कुटुंबेही स्थलांतर झाली आहेत. रोजगार नसल्याने नाइलजााने स्थलांतर व्हावे लागले आहे. त्यात संपूर्ण कुटुंब सोबत घेऊन स्थलांतर झाल्याने अनेक स्थलांतरित मजुरांची मुले ही शिक्षणांपासून दुरावली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तर काही मुलांचे शिक्षण हे मधूनच सुटत आहे. शाळाबा मुलांच्या शोध मोहिमेत स्थलांतरित मुले ही शाळाबा असल्याची बाब समोर आली होती.