भाईंदर :- मिरा भाईंदर महापालिकेच्या उर्दू शाळेत ‘क्षयरोग निर्मूलन केंद्र आणि प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशातील मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या पहिल्या दहा संसर्गजन्य आजारात क्षयरोग आजाराचा समावेश आहे. केंद्र शासनाकडून २०२५ सालापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. ते साध्य करण्यासाठी महापालिका किंवा जिल्हास्तरावर क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत शासनाकडून उद्दिष्टे देण्यात येतात. या अंतर्गत बाधित रुग्णांची माहिती घेऊन महापालिकेकडून त्यांना सुविधा उपलब्ध करून दिली जाते. दरवर्षी शहरात क्षयरोगाने बाधित होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जवळपास ४० ते ५० इतके आहे. त्यामुळे अशा रुग्णांना औषध साठा आणि तपासणी करण्यासाठी महापालिकेने शहरात विविध ठिकाणी क्षयरोग निर्मूलन केंद्र उभारले आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे यातील एक केंद्र हे मिरा रोड येथील उर्दू शाळेच्या खालीच सुरु करण्यात आले आहे. ही महापालिकेची शाळा क्रमांक ३४ असून यात पहिले ते दहावी पर्यंत शिक्षण घेणारे ५०२ विद्यार्थी आहेत. प्रामुख्याने क्षयरोग हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याचे केंद्र नागरी रहादारीपासून काही अंतरावर असणे गरजेचे आहे. परंतु प्रशासनाने शाळा इमारतीच्या तळ मजल्यावर क्षयरोग केंद्र, प्रयोगशाळा व इतर आजारांवर उपचार करण्यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्र उभारले आहे. परिणामी पालिका शाळेतील विद्यार्थी सतत गंभीर आजाराने बाधित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात वावरत असल्याने ते देखील या आजाराने बाधित होणार असल्याची भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचा – वसई : पालिकेने सुभोभीकरणासाठी हटवले चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे

मॉडेल शाळेच्या उभारणीसाठी केंद्र स्थलांतरित करणार :-

मिरा भाईंदर महापालिकेने शहरात ‘मॉडेल’ शाळा उभारण्यासाठी मिरा रोडच्या शाळा क्रमांक ३४ या उर्दू शाळेची निवड केली आहे. यात शाळेच्या इमारतीत भौतिक सुविधा आणि आधुनिक शिक्षण पद्धतीची उभारणी करण्याचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. शिव नदार फाउंडेशन आणि अझिम प्रेमजी फाउंडेशन या संस्थाच्या सामाजिक दायित्व निधीतून हे काम केले जाणार आहे. त्यामुळे इमारतीत खाली असलेले आरोग्य वर्धिनी केंद्र, क्षयरोग निर्मूलन केंद्र, प्रयोग शाळा, लस टोचणी केंद्र आणि औषध निर्माण कक्ष हे अन्य ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा – सैफ प्रकरणानंतर बांगलादेशींची धरपकड सुरू, मिरा रोडमधून ३ बांगलादेशी नागरिकांना अटक

विद्यार्थ्यांना धोका :-

लहान मुलांमध्ये प्रतिकारशक्ती मुळात अपुरी असते. यामुळे क्षयरोग रसग्रंथीच्या पलीकडे निरनिराळ्या इतर अवयवांत (मेंदू, मणके, सांधे, हृदय, इ.) पसरतो. ज्या अवयवांचा आजार होतो त्याप्रमाणे लक्षणे-चिन्हे असतात. जर पालिका शाळेतच क्षयरोग केंद्र असेल तर मुलांना संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. त्यामुळे महापालिका शहरात क्षयरोग निर्मूलनाचे काम करत आहे की पसरण्याचे? असा गंभीर सवाल रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tuberculosis eradication center at mira bhayandar municipal school students health is at risk ssb