वसई : तालुक्यात पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षकांची कमतरता भासू लागली आहे. सात समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी केवळ ९ सुरक्षारक्षक आहेत. त्यामुळे पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे चित्र दिसून येत आहे. वसई पश्चिमेच्या भागात विस्तीर्ण असे समुद्र किनारे आहेत. अर्नाळा, राजोडी, भुईगाव, सुरुची बाग, कळंब, नवापूर, रानगाव हे  समुद्रकिनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. मागील काही वर्षात वसई विरार हळूहळू विकसित होत असल्याने मुंबई, ठाणे, वसई विरार, भाईंदर यासह विविध  भागातून पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. विशेषतः विकेंडला या समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी अधिक असते. या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक नेमले आहेत. सद्यस्थितीत सुरुची- २ भुईगाव-२ अर्नाळा -२ व राजोडी-३ असे या समुद्र किनाऱ्यावर केवळ ९ जीवरक्षक आहेत. तर दुसरीकडे रानगाव, कळंब, नवापूर हे समुद्र किनारे जीवरक्षकांविनाच आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेसुमार वाळू उपसा, समुद्र किनाऱ्याची होणारी धूप यामुळे वसईतील समुद्र किनारे धोकादायक बनले आहेत. त्यामुळे अधूनमधून पर्यटक बुडण्याच्या घटना ही समोर येतात. तर दुसरीकडे काही वेळा पर्यटकांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने मृत्यू होण्याच्या घटना घडतात. या बुडणाऱ्या पर्यटकांना वाचविण्यासाठी जीवरक्षक हे अत्यंत महत्वाचे आहेत. परंतु त्यांचीच संख्या अपुरी असल्याने जीवरक्षक नेमके कोण कोणत्या ठिकाणी लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. जे जीवरक्षक आहेत त्यांनाही आवश्यक असलेली यंत्रसाम्रागी सुद्धा नाही त्यामुळे आणखीनच अडचणी येत आहेत. तसेच समुद्र किनारपट्टीवर लांबपर्यंत नजर ठेवण्यासाठी जीवरक्षकांसाठी मनोरे तयार केले आहेत. त्यांची सुद्धा अवस्था बिकट असल्याचे चित्र दिसून येत आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता समुद्र किनाऱ्यावर कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी जीवरक्षकांची संख्या वाढविणे, ध्वनी वर्धकाद्वारे सूचना करणे, सूचना फलक लावणे गरजेचे आहे असे नागरिकांनी सांगितले आहे.

हेही वाचा : पोलीस अकादमी लैंगिक शोषण प्रकरण : आरोपी समाधान गावडे न्यायालयीन कोठडीत

पोलिसांकडूनही पाठपुरावा

समुद्रात पर्यटक बुडून मृत्यू होण्याच्या घटना सातत्याने समोर येत असतात.  अशा घटना रोखण्यासाठी पालिका प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्या मार्फत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे.जीवरक्षकांची संख्या अपुरी असल्याने पर्यटकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे अडचणीचे ठरत आहे. पर्यटक बुडण्याच्या घटना थांबविण्यासाठी जीवरक्षकांची संख्या वाढविण्यात यावी याबाबत महापालिकेला पत्रव्यवहार केला असल्याचे वसई सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांनी सांगितले आहे. तसेच अर्नाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या समुद्रकिनाऱ्यांच्या संदर्भात सुद्धा पालिकेला सातत्याने पाठपुरावा केला आहे असे अर्नाळा पोलिसांनी सांगितले आहे.

पर्यटक बुडून मृत्यू झाल्याच्या घटना

१)  १९ मार्च २०२३ रोजी तुळींज येथील तीन तरुणांचा गट कळंब समुद्र किनारी फिरण्यासाठी आला असता पाण्यात बुडाले होते. यातील दोन तरुणांचा जीव वाचला तर स्वप्नील बावकर (२१) या तरुणाचा मृत्यू झाला.

२) १२ मार्च २०२३ रोजी विरारच्या अर्नाळा समुद्र किनारी नालासोपारा येथील रोशन लक्ष्मण गावडे (२३), सौरभ पाल (२२) या दोन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.

३)१३ एप्रिल २०२३- सुमित घाडगे (२१) या तरुणाचा राजोडी समुद्रात बुडून मृत्यू

४)१३ मे २०२३ रोजी औरंगाबाद येथे राहणाऱ्या साहिल त्रिभुवन या १५ वर्षीय मुलाचा वसईच्या भुईगाव समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाला होता.

५) २९ जून २०२३ अर्नाळा समुद्र किनारी आचोळे येथे राहणारा अमित गुप्ता या १७ वर्षीय मुलाचा मृत्यू

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai beaches guarded only 9 lifeguards tourists css
Show comments