वसई- मुंबई अमहदाबाद महामार्गावजवळील सापडलेल्या एका अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यापूर्वीच गुन्हे शाखा २ च्या पथकाने मारेकर्‍यास ताब्यात घेतले आहे. एका तृतीयपंथियाने ही हत्या केल्याच संशय आहे.

मुंबई अमहदाबाद महामार्गाजवळ असलेल्या सातिवली गावाजवळ एक खिंड आहे. गुरूवारी दुपारी २ च्या सुमारास येथील झुडपात एक अर्धनग्न अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आढळला होता. दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली होती. त्याचे वय ३० वर्षांच्या आसपास होते. त्याची ओळख पटेल अशी एकही वस्तू घटनास्थळी नव्हती. मयताची ओळख पटविण्याचे त्याचबरोबर मारेकऱ्याला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. मात्र मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा- २ च्या पथकाने अवघ्या २४ तासांच्या आत रुपा शेख नावाच्या तृतीयपंथीयाला या हत्या प्रकरणात संशयावरून ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा – वसई : प्रसिद्ध डॉक्टर प्रशांत चाफेकर यांचे निधन, कर्करोगाविरोधातील लढा ठरला अपयशी

हेही वाचा – गांधींना विरोध ही नथुराम गोडसेची प्रवृत्ती – थोरात

एका साडीमुळे मिळाला सुगावा..

घटनास्थळावर सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. गुन्हे शाखा २ च्या पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणावरे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली असता एक साडी तसेच वापरलेले काही कॉण्डम आढळले. त्यावरून पोलिसांच्या पथकाने या हत्येमागे तृतीयपंथी असल्याचा तर्क लावला. रात्रीच्या वेळी तृतीयपंथीय या परिसरात असतात आणि मयत तृतियपंथीयाकडे आलेला ग्राहक असू शकतो असा कयास पोलिसांनी लावला. रात्रीपासून पोलिसांनी शहरातील सर्व तृतियपंथीयांच्या वस्त्या, अड्डे यावर धाडी घातल्या. रुपा शेख नावाची तृतीयपंथीय या परिसरात व्यवसाय करत असते, याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. हत्या का करण्यात आली त्याचा तपास सुरू आहे. मयताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. त्याची छायाचित्रे परिसरात लावण्यात आली आहे. त्याची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.