वसई – मित्राच्या वाढदिवसासाठी जात असलेल्या एका तरुणाची क्षुल्लक वादातून हत्या केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. सौरव मिश्रा (२५) असे या मयत तरुणाचे नाव आहे. त्याच्या दुचाकीचा धक्का लागल्याने त्याला ५ जणांनी मारहाण केली होती. जखमी सौरभला ४ रुग्णालयांनी उपचारासाठी नकार दिला होता. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे.

सौरव मिश्रा (२५) हा तरुण नालासोपारा पूर्वेच्या शेरा सर्कल येथील विनी हाईट इमारतीत राहतो. सोमवारी त्याचा मित्र विवेक गुप्ता याचा वाढदिवस होता. मध्यरात्री १२ वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्याची योजना त्याच्या मित्रांनी बनवली होती. त्यानुसार रात्री साडे आठ वाजता सचिन शर्मा (२४) विवेक गुप्ता (२०) सोनू खान उर्फ कॅफी (२५) आणि सौरभ मिश्रा एकत्र भेटले. त्यांचा एक मित्र संतोष भुवन येथे राहतो. त्यांना घेण्यासाठी हे चौघे जण दोन दुचाकीवरून जाण्यासाठी निघाले. त्यावेळी संतोषभुवनच्या मोची पाडा येथे अजय चौहान (२०) आणि कौशिक चौहान (२१) हे दोघे भाऊ बसले होते. सौरभच्या गाडीचा धक्का त्यांना लागला. त्यावरून चौहान बंधूंनी सौरभवला शिविगाळ केली आणि शाब्दिक चकमच झाली. त्यानंतर चौहान बंधूनी सौरभ आणि विवेक यांना मारहाण करण्यास सुरवात केली. ते पाहून चौहान याचे आई वडिल आणि त्यांचा एक मित्र सुनिल सोनावणे त्या ठिकाणी आला. त्यांनी देखील या दोघांना मारहाण केली. सौरभच्या मित्रांनी मध्यस्ती करून कसेबसे भांडण मिटवले. त्यानंतर सौरभ आपल्या दुचाकीवरून जाण्यासाठी निघाला होता. मात्र अचानक कौशिक चौहान हा घरातून लोखंडी सळई घेऊन आला आणि त्याने सौरभच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे सौरभ रक्तबंबाळ होऊन खाली पडला. मध्यरात्री २ च्या सुमारास खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गाडीचा धक्का लागल्याने झालेल्या क्षुल्लक वादातून सौरव मिश्रा या तरुणाची हत्या करण्यात आली आहे, अशी माहिती परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्ता पूर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी दिली. याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

४ रुग्णालयांचा उपचारासाठी नकार…

जखमी सौरभला सुरवातीला विजय नगर येथील लक्ष्मी रुग्णालय, जाधव नगर येथील रुग्णालय, पालिकेच्या तुळींज रुग्णालय आणि विरारच्या संजीवनी अशा ४ रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यापाकील पालिकेच्या तुळींज रुग्णालयाने केवळ प्राथमिक औषधोपचार केले. लक्ष्मी रुग्णालयाने तर ५० हजार अनामत रक्कम ठेवण्यासाठी सांगितले होते. सर्व रुग्णालयांनी अन्य रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला, असे मयत सौरभ मिश्रा याचा भाऊ सुरज मिश्रा याने सांगितले. मध्यरात्री २ च्या सुमारास सौरभवला आचोळे येथील आयकॉन रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयांनी माझ्या भावाला दाखल करून घेतले नाही. पालिका रुग्णालयात तर मला रुग्णवाहिकेसाठी अर्धा तास वाट बघावी लागली. जर वेळीच उपचार झाले असते आणि रुग्णावाहहिका मिळाली असती तर माझ्या भावाचे प्राण वाचले असते, असे मयत सौरभ मिश्रा याचा भाऊ सुरज मिश्रा याने सांगितले.

Story img Loader