वसई: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर रस्ते ओलांडून प्रवास करताना अपघाताच्या घटना घडतात. अशा घटना रोखण्यासाठी दहा ठिकाणी पादचारी पूल तयार करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत सात ठिकाणच्या पुलाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

मुंबई, ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर यासह गुजरातला जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गालगतच अनेक छोटे मोठे गाव पाडे आहेत. या भागातील नागरिकांना दळणवळणासाठी महामार्ग हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे गाव पाड्यात राहणाऱ्या नागरिकांना महामार्ग ओलांडून धोकादायकरित्या प्रवास करावा लागतो. आता महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ ही बेसुमार वाढली आहे. त्यामुळे महामार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना रस्ते ओलांडून प्रवास करणे अधिकच जिकरीचे बनले आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना रस्ते ओलांडून जाताना अडचणी येत असतात. 

हेही वाचा – वसई : प्रसिद्ध डॉक्टर प्रशांत चाफेकर यांचे निधन, कर्करोगाविरोधातील लढा ठरला अपयशी

यापूर्वीसुद्धा रस्ते ओलांडून प्रवास करताना अनेक घटना घडल्या आहेत. काही जणांचा मृत्यू झाला आहे. यासाठी ज्या ठिकाणी गाव पाडे आहेत त्यांना दोन्ही बाजूने ये जा करण्यासाठी पादचारी उड्डाणपूल तयार करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गावर महामार्ग प्राधिकरणातर्फे वर्सोवा पुलापासून ते पालघरच्या अच्छाडपर्यंत दहा ठिकाणी पादचारी पूल तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विरार बावखळ टोकरेपाडा, वंगणपाडा नालासोपारा, शिवेचापाडा, कोल्ही चिंचोटी, ससूपाडा अच्छाड, जव्हार फाटा, दुर्वेस व अन्य दोन ठिकाणे यांचा समावेश आहे. यासाठी सुमारे ६९ कोटी रुपये इतका निधी खर्च केला जाणार आहे. ३५० ते ५०० मीटर लांबीचे हे पादचारी पूल आहेत. यापैकी सात पादचारी पुलांचे मुख्य मार्ग व दोन्ही बाजूंच्या उतार मार्गाचे स्ट्रक्चर पूर्णपणे तयार झाले आहे आहे. त्यातील जी काही अत्यावश्यक कामे आहेत ती अवघ्या एका महिन्यात पूर्ण केली जातील असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक सुहास चिटणीस यांनी सांगितले आहे.

पादचारी पुलाचे काम सुरूच आहे. सात पूलाचे जवळपास काम पूर्ण झाले आहे. उर्वरित पुलाचे कामही लवकरच मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. – सुहास चिटणीस, व्यवस्थापक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 

हेही वाचा – वसई : गुन्हे शाखा-२ च्या पथकाची जलद कामगिरी, मृतदेहाची ओळख पटण्यापूर्वीच आरोपी गजाआड

जुन्या खानिवडे टोलनाक्या जवळ पादचारी पुलाची गरज 

महामार्गावरील जुन्या  खानिवडे टोल नाक्याच्या जवळील भागातही मोठ्या संख्येने लोकवस्ती आहे. दररोज प्रतिभा विद्यामंदिर या शाळेतील विद्यार्थी,  पलीकडे शेती वाडी असलेले गावकरी, हनुमान नगर पाड्यातील आदिवासी, कष्टकरी कामगार, तसेच दर सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात बाजारहाट करण्यासाठी येणारे खरेदीदार व विक्रेते हे आपला जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडून प्रवास करतात त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

इतर दहा ठिकाणी ज्याप्रमाणे पादचारी पूल केले जात आहेत तसा एखादा पूल जुन्या खानिवडे टोलनाक्याच्या ठिकाणी उभारण्यात यावा अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. 

धोकादायक प्रवासातून सुटका होणार 

राष्ट्रीय महामार्ग असल्याने अनेकदा वाहने ही भरधाव वेगाने येतात. अशा वेळी रस्ते ओलांडून प्रवास करताना दोन्ही बाजूने रस्ता ओलांडून जाताना अडचणी येत आहेत. काही वेळा वाहने सुरूच असतात अशा वेळी महामार्गाच्या मध्येच दुभाजकामध्ये बराच वेळ थांबून राहावे लागते, पादचारी पूल तयार झाले तर रस्ते ओलांडून जाण्याची अडचण दूर होईल व धोकादायक प्रवासातून सुटका होईल अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.