वसई : वसई विरार महापालिकेत कायम सेवेतील कर्मचार्‍यांची भरती प्रक्रियेला रखडली असल्याने पालिकेने बाह्ययंत्रणेद्वारे ठेका पध्दतीने कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. एकूण १ हजार ६०० पदांसाठी हा त्रैवार्षिक ठेका असणार आहे. जुन्या ठेकेदाराची मुदत संपल्याने नव्याने मनुष्यबळ पुरविण्यााठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवली जात असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरार महापालिकेतर्फे कायम सेवेतील ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील १ हजार २८ जागांसाठी भरती केली जाणार आहे. २०२३ या वर्षी ही भरती प्रक्रिया होणे अपेक्षित होते. मात्र स्थानिकांना प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी ८ वेगवेगळ्या याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. याशिवाय इतर तांत्रिक अडचणींमुळे ही भरती प्रक्रिया होऊ शकलेली नाही. त्यामुळे वसई विरार महापालिकेने आता कंत्राटी मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी निविदा काढली आहे. बाह्ययंत्रणेद्वारे ही पदे भरली जाणार आहेत.

हेही वाचा : वसई : सहलीसाठी निघालेल्या शाळेच्या बसचा अपघात, भावाला सोडायला आलेल्या तरुणीचा मृत्यू

वसई विरार महापालिकेचे विविध विभाग, मुख्यालय आणि सर्व प्रभाग समितीच्या कामांसाठी हे मनुष्यबळ लागणार आहे. हे मनुष्यबळ २०२४-२५, २०२५-२६ आणि २०२६-२७ अशा तीन वर्षांसाठी असणार आहे. या १ हजार ६०० पदांमध्ये लिपीक टंकलेखक २७४, स्वच्छता निरिक्षक ४८, तारतंत्री ९०, अग्निशमन विमोचक १७७, वाहनचालक २०७, मजूर ३५१, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १००, घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी अर्धकुशल १२२, शिपाई २१, कक्ष सेवक (आरोग्य) ४१, उद्यान निरीक्षक ९ आदी काही प्रमुख पंदांचा समावेश आहे.

पालिकेचे मनुष्यबळ हे ठेका कर्मचार्‍यांमार्फत भरले जाते. बाह्ययंत्रणेद्वारे (आऊट सोर्सिंग) ते पुरवले जाते. सध्याच्या ठेकेदाराची मुदत संपत असल्याने ही निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे यांनी दिली. ही नवीन भरती नसून सध्या कार्यरत असलेले ठेका कर्मचारी नवीन ठेकेदाराच्या अखत्यारित कार्यरत राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : मीरा रोड दंगल प्रकरणात १० गुन्हे, १९ जणांना अटक; दंगलीमागे पूर्वनियोजित कट नसल्याचे स्पष्ट

भरती प्रक्रिया निवडणुकीनंतर?

२००९ साली शहरातील ४ नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतींचे विलिनिकरण होऊन वसई विरार महापालिकेची स्थापना झाली होती. तेव्हा पासून पालिकेत सरळ सेवेत भरती प्रक्रिया झालेली नव्हती. २०१४ साली पालिकेचा आकृतीबंध मंजूर झाला. त्यानुसार २ हजार ८५३ पदे मंजूर होती. यापैकी २७ अधिकार्‍यांची पदे प्रतिनियुक्तीवर भरण्यात आली होती तर उर्वरित सुमारे १ हजार पदे रिक्त होती. या १ हजार २८ पदांसाठी भरती केली जाणार आहे. वसई विरार महापालिकेतर्फे ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील १ हजार २८ जागांसाठी भरती केली जाणार आहे. नोकर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी पालिकेने टीसीएस कंपनी मार्फत नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टिसीएस बरोबर सर्व करार पूर्ण झाला आहे. २०२३ मध्येच ही भरती प्रक्रिया होणे अपेक्षित होते. मात्र स्थानिकांना प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी ८ वेगवेगळ्या याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. तांत्रिक कारणामुळे देखील भरती प्रक्रिया होऊ शकली नव्हती. आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली तर या भरती प्रक्रिया आणखी लांबण्याची शक्यता आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasai virar city municipal corporation 1600 vacant posts to be filled up on contract basis css
Show comments