सध्या डिजिटल अरेस्ट या नव्या सायबर फसवणुकीच्या प्रकाराने धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण देशात उच्चशिक्षित, श्रीमंत लोकांना व्हिडिओ कॉल करून डिजिटल अरेस्ट केल्याचे भासवून लाखो नव्हे तर कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला जात आहे. लोकांनी शिक्षण भरपूर घेतलं आहे, पैसाही कमवत आहेत मात्र कायद्याचे सामान्य ज्ञान नसल्याने ते या फसवणुकीला बळी पडत आहे. त्यामुळे सुशिक्षित असून अशिक्षित असे त्यांच्याबाबतीत म्हणण्याची वेळ आली आहे.

एका महिलेला एक फोन आला. तुमचे नाव एका घोटाळ्यात आले आहे. तुम्हाला अटक केली जात आहे. त्यासाठी तुमची तपासणी करायची आहे. ती महिला घाबरली. समोरच्या व्यक्तीने त्या महिलेला सांगितले तुमची तपासणी करायची आहे. ती महिला लगेच एका हॉटेलमध्ये गेली. तिला व्हिडिओ कॉल करण्यात आला. समोर महिला पोलीस होती. तपासणी करण्यासाठी समोरील महिला पोलिसांनी त्या महिलेला कपडे काढण्यास सांगितले. महिलेने त्यानुसार आपले कपडे काढले… मग त्यावेळी तिच्या काढण्यात आलेल्या अश्लील छायाचित्रांच्या आधारे तिला ब्लॅकमेल करण्यात आले. तिने ५० हजार रुपये पाठवले… ती महिला कुणी सामान्य नव्हती. तर वकील होती. वकील असूनही ती महिला डिजिटल अरेस्टची शिकार झाली होती. अटक करण्याची प्रक्रिया काय असते याचे देखील तिला ज्ञान नव्हते. डिजिटल अरेस्ट सध्या वाढत असलेला हा सायबर प्रकार. व्हिडिओ कॉल करून सायबर भामटे पोलीस असल्याचे भासवतात आणि मग तुम्हाला डिजिटल अरेस्ट केली आहे असे सांगून लाखो रुपये उकळतात. यामध्ये फसणारे सर्व उच्चशिक्षित आहेत, हे विशेष…देशभरातून दररोज अशा बातम्या वाचायला, पहायला मिळत आहे. तरी याचे प्रमाण थांबत नाही. डॉक्टर, अभियंते, बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणारे उच्चपदस्थ, सरकारी अधिकारी, बॅंकेतील अधिकारी देखील बळी पडत आहेत.

हेही वाचा – भाईंदर : …तर पालिका मुख्यालयावरुन उडी मारणार, कत्तलखान्याविरोधात नरेंद्र मेहता आक्रमक

वसईत एका आयटी क्षेत्रात काम करणार्‍याला दिड कोटींचा तर एका बॅंकेतून व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेल्या महिलेला २८ लाखांचा गंडा घालण्यात आला होता. हे प्रकार वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

काय आहे डिजिटल अरेस्ट?

या प्रकरणांमध्ये एखाद्या व्यक्तीच्या मोबाईलवर अचानक एका अनोळखी क्रमांकावरून फोन येतो. पलिकडून बोलणारी व्यक्ती तुमच्या नावावर असलेल्या बँक खात्यातून अनेक बेकायदेशीर व्यवहार झाले आहेत किंवा तुमच्या आधार क्रमांकाला जोडलेल्या मोबाईल क्रमांकावरून धमकीचे फोन गेले आहेत किंवा सध्या तपास चालू असलेल्या प्रकरणात तुम्ही एका प्रसिद्ध राजकीय व्यक्तीबरोबर गैरव्यवहारात सहभागी असल्याचे आढळून आले आहे, त्याच्या व्हिडीओ क्लिप्स आमच्याकडे आहेत किंवा तुमच्याविरुद्ध ड्रग तस्करी आणि मानवी तस्करीचा गुन्हा दाखल झाला आहे, अशी विविध कारणे सांगतात. सध्या कार्यरत असलेले पोलीस अधिकारी, सीबीआय अधिकारी यांचे बनावट ओळखपत्र पाठवून चौकशीसाठी व्हिडीओ कॉल करत असल्याचे सांगतात. व्हिडीओ कॉल केल्यावर समोर परराज्यातील आभासी पोलीस ठाण्याचा नकली देखावा तयार केला जातो. त्या कॉलमध्ये आधार कार्ड, पासपोर्ट नंबर असलेले वॉरंट दाखविले जाते. त्यानंतर तुमची चौकशी सुरू होईल, त्यामुळे तुम्ही खोली बाहेर जायचे नाही आणि खोलीतही कोणाला येऊ द्यायचे नाही; अन्यथा घरातील सर्वांनाच अटक करू, अशी धमकी देण्यात येते. डिजिटल अरेस्ट हा सायबर गुन्हेगारांनी निर्मिलेला मानसिक खेळ छळवणूक आहे. बळीत व्यक्तीला फक्त विविध गुन्ह्यात त्याचा सहभाग असल्याचे भासवून त्याला भीतीपोटी मानसिक बंधक असल्याचा भास निर्माण करणे, हे डिजिटल अरेस्टचे एक प्रकारे विश्लेषण करता येईल. या प्रकारात त्या बळीत व्यक्तीस कोणीही शारीरिकदृष्ट्या अटक केलेली नसते, पण त्याच्यावर केल्या गेलेल्या विविध आरोपांमुळे तो मानसिकदृष्ट्या प्रचंड दबावाखाली येतो आणि स्वतःला कपोलकल्पित अशा मानसिक बंधनात अडकवून ठेवतो. या त्याच्या मानसिक अवस्थेचा फायदा घेऊन गुन्हेगार त्याच्याकडून अवैधरीत्या पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात आणि काही प्रकरणात ते यशस्वी देखील होतात.

हेही वाचा – वसई : काशिमिर्‍यात घोडागाड्यांची शर्यत; ६ घोडे जप्त, तिघांना अटक

पण मुळात शिकलेले लोकं या प्रकाराला बळी पडतात याबद्दल चिंता व्यक्त होते. डिजिटल अरेस्ट नावाचा प्रकार अस्तित्वात नाही एवढी साधी माहिती देखील लोकांना नसते याचं आश्चर्य वाटतं. जग कितीही डिजिटल झाले असले, तरी घरातून बाहेर जाण्यास मनाई करणे, हे कोणत्याही कायद्यात नाही. अटक करण्यासाठी सरकारी यंत्रणेचे अधिकृत वॉरंट किंवा कोर्टाची ऑर्डर लागेल. फोन, स्काईप किंवा इतर माध्यमातून असे धमकावणे म्हणजे नक्कीच फसवणूक आहे हे लक्षात घ्यायला हवं. संगणक मायाजालामुळे खोटे पोलीस ऑफिस किंवा सरकारी ऑफिस तयार करता येते. आपल्याकडून एखादा गुन्हा घडला असल्यास चौकशी, जामीन, न्यायालयात हजर होणे यासाठी कायदेशीर प्रक्रिया असते. आपल्याला वकील घेऊन बाजू मांडायची संधी मिळते. त्यामुळे असा कॉल आल्यास या सर्व गोष्टींचा विचार करायला हवा. परिचितांशी, कुटुंबियांशी बोलायला हवं. अशा घटनांमध्ये सायबर भामटे स्काईप नावाचे ॲप डाउनलोड करायला सांगतात. ते अजिबात करू नका. अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास प्रत्यक्ष स्थानिक पोलीस ठाण्यात संपर्क करावा. सायबर गुन्ह्यांच्या अशा घटना वाढत आहेत. त्यामुळे केवळ उच्चशिक्षित असून चालत नाही. तर प्राथमिक ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असते. दररोज विविध माध्यमातून येणार्‍या बातम्यांचे अवलोकन करणे, नागरिकांच्या न्याय हक्कांबाबत माहिती करून घेणे आवश्यक आहे.