|| अमेय गुप्ते विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीत अनेक प्रतिभावंत व्यक्ती आपल्या जन्माने, निवासाने, मृत्यूने कायमच्या स्मरणात राहिल्या; त्यापैकी काही व्यक्तींचे जरी अल्पकाळ वास्तव्य असले तरी त्याची नोंद इतिहासात कायमची राहिली. याच पुण्यनगरीत बालकवी ठोंबरे यांचे अल्पकाळ वास्तव्य होते. १९११ मध्ये जळगावहून चरितार्थाचे साधन शोधण्याचा प्रयत्नामुळे बालकवी आपल्या कुटुंबासह पुण्यात आले व पुणे येथील रास्ता पेठेतील लखेरी मारुती मंदिराजवळ, घर नं. १०२ येथील घरात त्यांनी भाडय़ाने आपले बस्तान मांडले. बालकवींच्या कुटुंबात त्यांच्यासह पत्नी पार्वतीबाई, मातोश्री गोदुताई, बहीण कोकिळा आणि भाऊबाबू हे होते. हे घर म्हणजे त्या काळी जणू काव्यनिर्मितीचे एक केंद्रच बनले होते. याच ठिकाणी कवी गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी यांची व बालकवींची पहिली भेट घडली. त्या वेळी बालकवी टिळकांच्या ‘केसरी’ या साप्ताहिकात संपादकीय विभागात काम करीत असत. पुण्यात आल्यावर बालकवींची आर्थिक स्थिती जरा सुधारली. काही शिकवण्या मिळाल्या, लँग्वेज स्कूल येथे शिक्षक म्हणून नोकरी मिळाली. त्यांचे काव्यही बहरले. या रास्ता पेठेच्या घरात सर्व कवी मंडळी जमायची. भाषाप्रभू राम गणेश गडकरी यांचे प्रबोधनात्मक विचार आणि बालकवींचे काव्यात्मक विचार याच वास्तूत सुचले. या वास्तूत प्रथम बालकवींनी ‘संक्रांत’ ही कविता लिहिली. ‘अनंत’, ‘तृष्णपुष्प’, ‘ध्येय’, ‘कवी’, ‘रागोबा आला’, ‘तारकांचे गाणे’ , ‘ज्योत’, ‘अरुण’, ‘संध्या-रजनी’, ‘फुलराणी’, ‘यमाचे दूत’, ‘फुलपाखरू फुलवेली’. ‘सुकलेली फुले’, ‘दिव्य आणि प्रीती’, ‘काळाचे लेख’, ‘निर्झरास’, ‘छोटय़ा बालकास’, ‘संध्यातारक’, ‘प्रेम लेख’, ‘सुभाषित’, ‘अप्सरांचे गाणे’, ‘धर्मवीर’, ‘कवीची इच्छा’.. या कविता याच वास्तूत त्यांनी लिहिल्या. हे घर म्हणजे साधारण १०७१० च्या दोन खोल्या असून प्रथम आत गेल्यावर उजव्या बाजूला लहान मोरी आहे. तिच्या बाजूला स्वयंपाकाचा ओटा असून तेथे भिंतीत दोन कपाटे आहेत. डाव्या बाजूच्या खोलीत भिंतीत दोन कपाटे असून भिंतीत काही ठिकाणी खुंटय़ा दिसतात. घराची आखणी साधी आहे. या वास्तूत बालकवींचे सन १९११ ते १९१६ या काळात वास्तव्य होते. त्यांची कविता खऱ्या अर्थाने याच वास्तूत बहरली, फुलली व जनमानसात लोकप्रिय झाली. १९१६ मध्ये पुण्यात प्लेगची साथ आल्याने बालकवी आपल्या कुटुंबासह काही दिवस राम गणेश गडकरी यांच्या १३६ कसबा पेठेतील घरात राहिले, पण प्लेगची साथ अजून वाढत गेल्याने त्यांचे मोठे बंधू अमृतराव यांनी त्यांना पुणे सोडून नेवाली येथे जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे बालकवी नोकरीचा राजीनामा देऊन कुटुंबासह नेवाली येथे गेले. त्यानंतर बालकवी आपल्या गावी जळगाव येथे गेले व ५ मे १९१८ रोजी जळगाव आणि भुसावळमधील भादली या रेल्वे स्थानकात रेल्वे रूळ ओलांडताना त्यांचे अपघाती निधन झाले. याच घरात अनेक वर्षांनी कवी सुधाकर गणेश नेर्लेकर हे राहत असत. त्यांची कविताही याच घरात बहरली. त्यांचा ‘गर्दी’ हा काव्यसंग्रह याच घरात प्रसिद्ध झाला. ‘काव्यशिल्प’ या संस्थेची स्थापना याच वास्तूत झाल्याची साक्ष आजही जुनी मंडळी देतात. सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांनी ‘पंढरीची वारी’ या चित्रपटाची पटकथा नेर्लेकर राहत असताना याच घरात लिहिली तर संगीतकार सुरेंद्र अकोलकर यांनी अनेक गीते याच वास्तूत स्वरबद्ध केली. या वस्तूला कवी दिलीप चित्रे, नारायण सुर्वे, कवी ग्रेस, सुरेश भट, विमल लिमये, नंदकुमार पुरोहित, मनोहर सोनावणे, प्रदीप निफाडकर अशा दिग्गज व्यक्तींचे पाय लागले असून, बालकवी ठोंबरे यांच्या निवासाने व परिसस्पर्शाने पावन झालेल्या वस्तूचे दर्शन एकदा तरी घ्यावे. ameyagupte66@yahoo.com