‘एक बंगला बने न्यारा
रहे कुणबा जिसमें सारा
सोने का बंगला, चंदन का जंगला
विश्वकर्मा के द्वारे अति सुंदर प्यारा प्यारा
एक बंगला बने न्यारा’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सुखासमाधानानं भरलेल्या घरातून स्वखुशीने कोणी कायमचे निघून जात नसेल. विरागी संन्यासी अपवाद. पण ‘आशीर्वाद’ सिनेमात आपल्या मुलीवर जिवापाड प्रेम करणारा बाप (अशोककुमार) मजबुरीने घर सोडून जातो. त्याच्या पाठीमागे बापासाठी तळमळणारी लेक एकटीच लहानाची मोठी होते. मनात बापासाठी झुरत राहते. तिला बापाच्या आठवणी कशा छळतात ते एका गाण्यात फार उत्कटपणे व्यक्त झाले आहे-
‘एक था बचपन, एक था बचपन
छोटासा नन्हासा बचपन’
एका कडव्यात ती म्हणते की माझे बाबा खूप छान होते. आमच्यात प्रेमाचं अतूट बंधन होतं. हे अगदी सार्वत्रिक असलं ती कळवळून सांगते आपल्याला. लहानपणी एखाद्या वस्तूसाठी मुलांचा हात उंचावर पोचत नसेल तर ती वस्तू स्वत: काढून देण्याऐवजी बाळाला वर उचलून ती वस्तू स्वत:च्या हातांनी घेऊ दिली तर बाळाची कळी अधिक खुलते.
‘टहनी पर चढकर जब फूल बुलाते थे
हाथ उसके टहनी तक वह ला जाते थे
बचपन के नन्हें दो हाथ उठाकर वो
फूलों से हाथ मिलाते थे
एक था बचपन’
सिनेमात तिच्या दृष्टीने कायमचा हरपलेला बाप असो, की रोजच्या जीवनात लग्नानंतर दूरस्थ झालेलं माहेर असो, सुख शिगोशिग भरून लाभले तरी प्रत्येक मुलीला वाटतंच की आपलं बालपण परतून यावं, आपण लहान व्हावं, बाबानं तरु ण व्हावं नि आपल्याशी दंगामस्ती करावी. पण एकदा सरलेला भूतकाळ, हरवलेला बाबा परत मिळत नाही.
‘होठोंपर उनकी आवाज भी है
सांसों में सौंपा विश्वास भी है’
तरीदेखील आता तो बाबा भेटलाच तर कल्पनेत किंवा स्वप्नातच..
‘जाने किस मोडपे कब मिल जाएंगे वो’
आणि केव्हा तरी कातरवेळी जुना अल्बम बघताना दाटून आलेल्या माहेरच्या, आईच्या आठवणी..
‘फटे पुराने एक अल्बम में
चंचल लडकी जैसी मां
बीवी बेटी बहन पडोसन
थोडी-थोडी सी सब में मां
आधी सोयी, आधी जागी
थकी दोपहरी जैसी मां’
जुन्या आठवणी प्रत्येकाच्या मनाच्या माळय़ावर साठून असतात. अधूनमधून त्यावरची धूळ झटकली की मी मी म्हणणारी माणसं व्याकूळ होतात.. जाने कहाँ गये वो दिन, कृष्णाकाठी कुंडल आता पहिले उरले नाही, असे काहीबाही त्यांच्या ओठांवर येते. पण ते सुंदर दिवस असतात का खरोखरच अस्तित्वात? की हे सारे मनाचे खेळ? ‘आशीर्वाद’ सिनेमातला अशोककुमार एका निर्वाणीच्या निकराने मुलीला भेटायला निघतो तेव्हा गाडीवान आपल्या गीतातून त्याला समजावतो,
‘राही का राहों से रिश्ता जनम-जनम पुराना
एक को चलते जाना आगे, एक को पीछे आना’
आपण पुढे चालत जातो नि कटू वर्तमानाचे काटे झडतात. एखाद्या शुष्क पाकळीसारखा नाजूक विव्हल होऊन तो मागे निघून जातो. तो परत येणार नसतो. म्हणूनच बहुधा केविलवाणा भासतो. एका अगदी बुद्धिवादी सरांची अशीच जुनी आठवण सांगायची आहे. आता ते हयात नाहीत. त्यांच्या पत्नीचा पत्ता ठाऊक नाही.
परवा सहज वाटलं नि तब्बल पंचवीसहून अधिक वर्षांनी मी त्यांच्या घरासमोर जाऊन उभा राहिलो. दारावरचे खडूने लिहिलेले नाव आता दिसेनासे झाले होते. कडीकुलूप इतके जीर्ण की एक हिसडा दिल्यावर निखळून पडेल. एकाच शहरात राहूनदेखील मी आजवर इथे का फिरकलो नाही याला नेमके उत्तर नाही. सरांचे निधन झाले होते. पण त्यांची लेखक पत्नी तिथे काही काळ राहात होती. काही वर्षांनी तिचे नाव छापून येणे थांबले नि ती जशी काही शहरात विरघळूनच गेली. त्या बंद दारापुढे उभा असताना मुकेशचं गाणं आठवलं.
‘एक वह भी दिवाली थी, एक यह भी दिवाली है
उजडा हुआ गुलशन है, रोता हुआ माली है’
सगळेच शब्द मनातल्या आशयाशी सुसंगत नव्हते, पण सूर मन:स्थितीशी जुळत होते. हे दोन खोल्यांचे घर एकेकाळी सतत अभिजात रसिकांच्या गर्दीने गजबजलेले असे. पुस्तकांनी, मासिकांनी भरलेल्या बाहेरच्या खोलीत सतत रसिकांचा वावर असे.
आमची ओळख झाली तेव्हा सर अविवाहित होते. त्या वेळेपासून लग्न आणि निधन होईपर्यंतचा त्यांच्या घराचा प्रवास मी पाहिला आहे. एकदा त्यांनी मला टेलिफोन खात्यात जाऊन एक अर्ज विकत आणायला सांगितला. दोन दिवसांनी मी अर्ज आणला. त्यांच्या घरी गेल्यावर दिला. त्यांनी खिशातून अर्जाची किंमत काढून दिली. नंतर भिंतीवरच्या कॅलेंडरला टाचणीने लावलेल्या कागदावरची नोंद खोदली. त्या कागदावर ते रोजच्या देण्याघेण्याच्या नोंदी करीत. कागद संपला की नवीन कागद लावत. लग्नानंतर तो कागद गायब झाला, पण त्या खोलीतली पुस्तकं किंवा नियतकालिकं कमी झाली नाहीत. त्यांची पत्नी त्यांची पीएच.डी.ची विद्यार्थिनी होती.
लग्नानंतर घराची सजावट, शिस्त अजिबात बदलली नाही. पण काही गोष्टी बदलल्या. रविवारी सकाळी मी त्यांच्याकडे जायचो नि आम्ही दोघे कॅफे डिलाईट किंवा कॅफे सनराईजमध्ये चहाला जायचो. तिथे सरांचे इतर मित्र हळूहळू जमत. गप्पांचा फड जमे. गप्पा म्हणजे बहुतेकदा सर बोलायचे नि आम्ही ऐकायचो.
लग्नानंतर घरीदेखील अर्धा कप चहा घ्यायला आणि मग बाहेर जायला सुरुवात झाली. घराला घरपण ते इतकेच आले. सहकुटुंब वगैरे कुठे एकत्र जेवायला जायचा प्रसंग आला नाही.
नंतर त्या घरावर एक संकट आले. त्यात सर खचले. आता शंका येते की त्या वेळी त्यांना स्किझोफ्रेनिया झाला असावा. पण नक्की सांगता येत नाही. सरांचे निधन झाले. त्यानंतर दोनतीनदा घरी गेलो नि हळूहळू बंद झालो. सरांचे ते मित्रांनी-माणसांनी गजबजलेले घर भूतकाळाने आता गिळून टाकले आहे. आज का इथे आलो ते ठाऊक नाही. पुन्हा केव्हा येईन ते माहिती नाही. ही इमारत, ही कॉमन बाल्कनी, हा परिसर अनोळखी झाले आहेत.
‘चलाच रसिका, माझ्याखातर त्या राईत फिराया
भलत्या वेळी, भरल्या ठायी, भलती मौज पहाया’
असे मी वाचकांना म्हणू शकत नाही. कारण त्या घरापाशी गेल्यावर तुम्हाला काही दिसणार नाही. जे दिसते, जे आठवते, ते फक्त माझ्या एकटय़ासाठी आहे. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांनी एका लेखात म्हटले आहे तसे कृष्णाकाठचे कुंडल आहे तरी कुठे? की तो एक निर्गुणी निराकार शोध आहे?
ते कुंडल, तो भूतकाळ फक्त आपल्या मनात असतो. तो पुन्हा जिवंत करण्याचा अट्टहास धरू नये. कारण तो असतो फक्त आपल्यापुरता किंवा आणखी कुणा हरवलेल्या स्वजनांपुरता. तो फक्त स्मरावा, कंठ दाटून आला तर आवंढा गिळावा.
काठ राहुनी उदके सरली.. जनकाची मिथिला, पांडवांची मयसभा, कृष्णाची द्वारका, विजयानगरचे साम्राज्य, हे सगळे त्या वास्तूत नांदणाऱ्या नशीबवानांच्या ललाटी आणि नंतर स्मरणात होते. त्यांच्याबरोबर गेले. सुंदर वास्तू आणि वास्तुपुरु ष यांचे एकमेव शांतिस्थान म्हणजे भूतकाळ. स्मरणकाळ. ग्रीसमध्ये सॉक्रेटीसने आणि राजस्थानमध्ये मीरेने आपापले पेले घेऊन ही शांतिस्थाने जवळ केली. श्रीकृष्ण तर पूर्णपुरु ष होता. तरी त्याच्या समोर द्वारका बुडाली. तेव्हा तो विषण्ण झाला असेल की स्थितप्रज्ञ राहिला असेल? अवतारसमाप्तीपूर्वी दूरवरच्या एकाकी वृक्षाखाली विसावा घेत त्याने मरण स्वीकारले. द्वारकेतल्या कृष्णाकाठचे कुंडल तेव्हा त्याच्यादेखील स्तब्ध मनात तरळून गेले असेल काय?