|| भगवान मंडलिक कल्याण-डोंबिवली शहरांत मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून केंद्र, राज्य शासनाने पालिकेला पंधरा वर्षांपूर्वी सुमारे बाराशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या माध्यमातून रस्ते, पाणी, जल-मलनि:स्सारण ही नागरी सुविधांची बहुतांशी कामे पूर्ण करण्यात आली. कल्याण-डोंबिवली शहरे झोपडपट्टीमुक्त झाली पाहिजेत म्हणून शहरी गरिबांना परवडणारी साडेसात हजार घरे सुमारे ३५० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली आहेत. या घरांमध्ये शहरी झोपडपट्टीतील सतराशे लाभार्थी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या इमारतींत राहण्यास गेले आहेत. या घरांमधील सुमारे तीन हजार घरे ‘पंतप्रधान आवास’ योजनेतील लाभार्थीना वाटप करण्यात येणार आहेत. ज्यांना अद्याप कोठेही हक्काचा निवारा नाही, अशा बेघर लाभार्थ्यांना या योजनेत हक्काचे घर मिळणार आहे. शहरातील मुख्य वर्दळीच्या रस्त्यांचे सीमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले आहे. पूर्वीच्या कल्याण-डोंबिवली नगरपालिका हद्दीपुरत्या मर्यादित असलेल्या जल-मलनि:स्सारण योजना विस्तारण्यात आल्या आहेत. अशी शहर विकासाची मूलभूत सुविधांनी पाया पक्का करणारी कामे कल्याण, डोंबिवली, कोपर भागात पूर्ण झाली आहेत. मूलभूत सुविधांचा पाया पक्का झाल्यामुळे विकासकांनी आतापर्यंत दुर्लक्षित, दलदलीच्या जमिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण, डोंबिवली, कोपर पट्टय़ातील जमिनींकडे आपला म्होरा वळवून टोलेजंग इमारतींची कामे सुरू केली आहेत. विकासाच्या वाटेवरील कोपर डोंबिवली पश्चिमेतील कोपर हा खाडीकिनाऱ्याजवळचा पट्टा. सदाहरित भाग म्हणून हा पट्टा ओळखला जातो. कोपर मध्य रेल्वे मार्गावरचे रेल्वे स्थानक आणि वसई-विरारकडे जाणारे अप्पर कोपर रेल्वे स्थानक विकसित झाल्यापासून कोपर रेल्वे स्थानक परिसराचा विकास झाला आहे. घराजवळचे रेल्वे स्थानक म्हणून रहिवासी या भागातील इमारतींमध्ये राहण्याला पसंती देत आहेत. २७ गावांमधील हेदुटणे, भोपर, कोपर, मोठागाव ते ठाकुर्ली-टिटवाळा हा २१ किलोमीटरचा लांबीचा कल्याण, डोंबिवली शहराबाहेरचा बावळण रस्ता (रिंगरूट) कोपर खाडीकिनारा भागातून जात आहे. त्यामुळे कोपर भागातील रहिवासी आपल्या वाहनाने डोंबिवली शहरात न जाता थेट बा वळण रस्त्याने टिटवाळ्याकडे जाऊ शकतो. कोपर गावापासून रिक्षाने पंधरा मिनिटांच्या अंतरावर मोठागाव रेतीबंदर खाडीवर डोंबिवली ते माणकोली उड्डाण पुलाचे काम प्रगतिपथावर आहे. या पुलामुळे कोपर पट्टय़ातील रहिवासी अर्धा तास ठाणे व त्या पुढील काही अंतराने मुंबईला पोहचणार आहे. मोठागाव उड्डाण पुलामुळे कोपर भागातील रहिवाशाला डोंबिवली शहरात जाण्याची गरज उरणार नाही. अशा पायाभूत सुविधा या परिसराच्या चोहोबाजूने उभारण्यात येत आहेत. मुंबईत नोकरी करीत असलेला आणि लोकलच्या गर्दीला कंटाळलेला कोपर भागातील रहिवासी आपल्या स्वत:च्या वाहनाने किंवा खासगी वाहनाने तासाभराच्याआत मोठागाव उड्डाण माणकोली पुलावरून, मुंबई-नाशिक महामार्गावरून इच्छित स्थळी जाऊ शकेल. येणाऱ्या काळात जलवाहतूक सुरू करण्याचे केंद्र, राज्य शासनाचे धोरण आहे. या कामासाठीचे प्रकल्प अहवाल तयार करण्याची कामे शासन पातळीवर सुरू आहेत. कोपर भागाला प्रशस्त खाडीकिनारा आहे. कल्याण ते ठाणे-वसई असा जलमार्ग प्रस्तावित आहे. या जलवाहतुकीचा लाभ डोंबिवलीतील रहिवाशांना घेता येणार आहे. कल्याण-डोंबिवली खाडीकिनारा विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाने मंजूर केला आहे. हरित पट्टा म्हणून हा भाग विकसित करण्यात येणार आहे. या कामासाठी शासनाने दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या कामासाठी एक कोटीचा निधी मंजूर केला आहे. कल्याण, डोंबिवली खाडीकिनारीचे वाळू तस्करांचे अड्डे महसूल विभागाने उद्ध्वस्त केल्यामुळे किनारा परिसरातील वाळू उपसा यंत्रांची सततची घरघर बंद झाली आहे. आणि खाडीकिनारे, तेथील जैवविविधता आता खऱ्या अर्थाने निवांत झाली आहे. हा निवांतपणा आणि विकसित होत असलेल्या खाडीकिनाराचा डोंबिवली परिसरातील रहिवाशांना मोकळा श्वास घेण्यासाठी उपयोग होणार आहे. आजही शेकडो डोंबिवलीकर शतपावलीसाठी सकाळ, संध्याकाळ खाडीकिनारी येतात. येथील पक्षी, निसर्ग विविधतेचा आस्वाद घेतात. डोंबिवली पश्चिमेला मोठागाव, कोपर, रेतीबंदर पट्टय़ातील २५० एकर जमिनीवर सर्व सुविधांनी युक्त असे विशेष नगरनियोजन योजनेखाली एक अत्याधुनिक शहर वसविण्याचा प्रस्ताव कल्याण-डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागाने तयार केला आहे. या नवीन शहरामुळे शहर विकासात आणखी भर पडणार आहे. चंदिगडसारखे आखीव-रेखीव शहर डोंबिवलीच्या उंबरठय़ावर आपणास पाहावयास मिळणार आहे. विरार ते अलिबाग द्रुतगती महामार्ग कल्याण-डोंबिवली शहरांजवळून जात आहे. या रस्त्यांमुळे काही तासांच्या अवधीत कोकणच्या दिशेने जाणे कल्याण, डोंबिवलीतील रहिवाशांना सहज शक्य होणार आहे. ‘स्मार्ट सिटी’मध्ये कल्याण-डोंबिवली शहरांचा समावेश आहे. या योजनेतून पालिकेला २८० कोटींचा विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. रस्ते, घरकुल, सिटी पार्क, मनोरंजन नगरी अशी शहर सुधारणेत भर घालणारी नागरी हिताची कामे या निधीतून करण्यात येणार आहेत. शहर सुरक्षिततेच्या दृष्टीने या योजनेतून शहराच्या विविध भागांत ६५० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले आहे. शहरातील पायाभूत सुविधा, विकासाबरोबर शहरातील प्रत्येक रहिवाशाची सुरक्षितता महत्त्वाची आहे, हा विचार करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. नवनगरांचा विकास कल्याण-डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातर्फे ‘स्मार्ट सिटी’चा एक भाग म्हणून ‘नगर परियोजनेंतर्गत (टाऊन प्लॅनिंग स्किम) कल्याण पश्चिमेत उल्हास खाडीकिनारी उंबर्डे, वाडेघर भागातील २५० हेक्टर जमिनीवर अत्याधुनिक सुविधांनी युक्त नवीन शहर वसविण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. कोरियन कंपनीने हे शहर वसविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आयटी पार्क, सिटी पार्क, मनोरंजन नगरी, उद्याने, बगीचे आदी सुविधा या नवनगरात पाहण्यास मिळणार आहेत. अत्याधुनिक वस्तीमुळे तसे रहिवासी येथे असणार आहेत. शैक्षणिक सुविधेत शहर कोठे मागे पडू नये म्हणून मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सज्ज झाले आहे. या केंद्रामुळे प्रत्येकवेळी विद्यार्थ्यांना मुंबईत विद्यापीठात धाव घेण्याची गरज लागणार नाही. कल्याणमध्ये सीटी पार्क विकसित करण्यात येणार आहे. कल्याण पूर्वेतील रस्त्यांचे रुंदीकरण करून या भागातील कोंडी फोडण्यात आली आहे. चक्कीनाका ते नेवाळी रस्त्याच्या रुंदीकरणामुळे कल्याण पूर्व भाग कोंडीमुक्त झाला आहे. शहर विकासाची लहान-मोठी कामे पालिकेच्या निधीतून सुरू आहेत. चालू वर्षी सुमारे ११५० कोटींची विकास कामे पालिका निधीतून कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत प्रस्तावित आहेत. माजी आयुक्त पी. वेलरासू यांनी पालिकेची आर्थिक घडी नीट बसविल्यामुळे हा निधी विकासासाठी उपलब्ध होणार आहे. याशिवाय पंतप्रधान आवास योजनेतून पालिकेला सुमारे ३५० कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प तात्काळ आकाराला यावा यासाठी या योजनेचे कार्यकारी अभियंता सुनील जोशी प्रयत्नशील आहेत. शहर विकासासाठी आलेल्या निधीचा योग्य विनीयोग व्हावा म्हणून पालिकेतील काही अधिकारी तळमळीने काम करीत आहेत. त्याचा लाभ येत्या काळात शहर विकासाला नक्की होणार आहे. नागरी सुविधांचा केंद्र, राज्य आणि पालिकेच्या पातळीवरून सुरू असलेला निधीचा ओघ कल्याण-डोंबिवलीचे रंगरूप बदलणार आहे. मेट्रो मार्ग कल्याण मध्य रेल्वेचे जंक्शन आहे. शेकडो लांब पल्ल्याच्या, लोकल गाडय़ा या रेल्वे स्थानकातून दररोज धावतात. या रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी ६५० कोटींचा विकास आराखडा रेल्वेने तयार केला आहे. विविध प्रवासी सुविधा या माध्यमातून देण्यात येणार आहेत. मुंबईवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी ठाकुर्लीत लांबपल्ल्याच्या गाडय़ांसाठी अप्पर रेल्वे टर्मिनस बांधण्यात येणार आहे. त्यामुळे कल्याण परिसरातील उत्तर, दक्षिणेत जाणाऱ्या प्रवाशांना मुंबईत दादर, कुर्ला किंवा सीएसएमटी येथे जाण्याची गरज लागणार नाही. कल्याण शहराचे वाढते नागरीकरण विचारात घेऊन यापूर्वीचा कल्याण रेल्वे स्थानक परिसर वाहने, पायवाटेसाठी अपुरा पडू लागला आहे. त्यामुळे कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे स्थानक ते राज्य परिवहन महामंडळाचा आगार भागात ‘सॅटिस’ योजनेंतर्गत प्रवासी हिताच्या सुविधा देण्यात येणार आहेत. कल्याण एस. टी. आगाराचा विकास करण्यात येणार आहे. एकाच ठिकाणाहून प्रवाशांना रिक्षा, बस, केडीएमटी बस सुविधा उपलब्ध होईल, अशी सुविधा या ‘सॅटिस’ प्रकल्पात आहे. ठाणे-भिवंडी-लाल चौकी ते कल्याण बाजार समितीपर्यंत मेट्रोचा मार्ग प्रस्तावित आहे. या मेट्रो मार्गापर्यंत जाण्यासाठी सॅटिस प्रकल्पात रेल्वे स्थानक ते मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. त्यामुळे लोकलच्या गर्दीला कंटाळलेला कल्याणमधील प्रवासी मेट्रोने ठाणे ते मुंबई प्रवास करू शकणार आहे. हा मेट्रो मार्ग लाल चौकी, आधारवाडी, खडकपाडा ते बिर्ला महाविद्यालय ते कल्याण पूर्व भागातून नेण्याची मागणी शासन पातळीवर करण्यात आली आहे. हा मार्ग मंजूर झाला तर कल्याण रेल्वे स्थानकावर येणारा प्रवाशांचा, वाहनांचा भार निम्म्याहून अधिक पटीने कमी होऊन प्रवासी मेट्रोने प्रवास करणे पसंत करतील. मेट्रोचा एक मार्ग नवी मुंबईतून तळोजापर्यंत प्रस्तावित आहे. कल्याण मेट्रोचा भाग तळोजापर्यंत शिळफाटा मार्गे जोडण्यात आला तर नवी मुंबई, पनवेलकडे जाणाऱ्या प्रवाशांचा मार्ग सुकर होणार आहे. कल्याण रेतीबंदर भाग जलवाहतुकीसाठी योग्य ठिकाण आहे. या ठिकाणाहून शासनाने जलवाहतुकीचा थांबा निश्चित केला आहे. त्यामुळे येत्या काळात कल्याण ते ठाणे, मुंबई, वसई जल मार्गाने प्रवास करणे शक्य होणार आहे. कल्याण शहराचे वाढते नागरीकरण विचारात घेऊन दुर्गाडीजवळ नवीन पूल उभारण्यात येत आहे. दुर्गाडी ते बाजारपेठ खाडीकिनारा विकसित करण्यात येणार आहे. त्यामुळे रहिवाशांना मनोरंजन नगरीसारखे एक ठिकाण उपलब्ध होणार आहे. खाडीकिनारचे पक्षी निरीक्षण करण्यासाठी डोंबिवली, कल्याण, कोपर भागात पक्षी टेहळणी मनोरे बांधण्यात येणार आहेत. ठाकुर्लीजवळील ९० फुटी रस्ता, गोविंदवाडी बा वळण रस्त्याने शहरातील वाहतूक कोंडीवर मात करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुसज्ज, प्रशस्त रस्ता तेथे इमारत, असे विकासाचे सूत्र असल्याने अलीकडे विकासक आकर्षक रस्ते करण्याला प्रथम प्राधान्य देत आहेत. अशाच प्रकारचे आकर्षक म्हणजे ठाकुर्लीतील ९० फुटी रस्ता. सध्या हा रस्ता सगळ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. या भागातील वस्तीला त्याचा लाभ होत आहे. सुनियोजित शहराच्या दिशेने.. कल्याण पश्चिमेतील उंबर्डे, सापाड भागात पालिकेतर्फे विशेष परियोजनेत नवीन शहर वसविण्यात येणार आहे. यासाठी संबंधित ग्रामस्थांची ग्रामसभा घेण्यात आली. या योजनेची माहिती त्यांना देण्यात आली. आता या योजनेतून ग्रामस्थांना जमिनीच्या बदल्यात होणारे लाभ याची समग्र माहिती देण्यात येईल. ग्रामस्थांनी एकदा होकार दिला की त्या संबंधीचा प्रस्ताव पुणे येथील नगररचना विभागाचे संचालक यांना पाठविण्यात येईल. त्यानंतर अधिसूचना, ग्रामस्थांच्या हरकती घेऊन हे प्रकरण शासनाकडे अंतीम मंजुरीसाठी पाठविण्यात येईल. अशाच प्रकारे डोंबिवली मोठागाव मध्ये एक नवीन शहर उभारणीचा प्रस्ताव आहे. महासभेने प्रक्रिया पूर्ण केल्या की त्यानंतर तेथील कामे हाती घेण्यात येतील. अन्य विकास कामे पालिका हद्दीत संबंधित विभागातर्फे सुरू आहेत. सुरेंद्र टेंगळे , नगररचनाकार, कडोंमपा. कल्याण-डोंबिवलीचा कायापालट कल्याण रिंगरूट, मोठागाव माणकोली उड्डाण पूल, शिळफाटा-कल्याण रस्त्याचे सहा पदरीकरण आणि उन्नत मार्ग, ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो या प्रकल्पांमुळे कल्याण, डोंबिवलीतील वाहतुकीचे प्रश्न सुटण्यास मोठय़ा प्रमाणावर मदत होणार आहे. कल्याण-डोंबिवली शहरांचा समूह विकास योजनेत समावेश करण्यात आला आहे. त्याची विकास नियंत्रण नियमावली तयार करण्याचे काम सुरू आहे. २७ गावांचा पाणी प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी अमृत योजनेतून निधी मिळविण्यात आला आहे. ही कामे प्रस्तावित आहेत. मागील चार वर्षांत रेल्वेशी संबंधित अनेक महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावल्याने प्रवाशांना सुखकर प्रवास करणे शक्य झाले आहे. ठाण्याच्या पुढे ३५ लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या. ठाकुर्ली रेल्वे टर्मिनस, कल्याण यार्ड पुनर्रचनेमुळे लोकल सेवेवरील ताण कमी होण्यास सा होणार आहे. ठाणे ते दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेच्या रखडलेल्या कामाला गती दिली. दिवा, ठाकुर्ली रेल्वे स्थानकाचा कायापालट केल्यामुळे तेथील प्रवासीसंख्या वाढली. या रेल्वे स्थानकात अवघ्या पाच रुपयांत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. प्रवाशांचा त्रास वाचविण्यासाठी प्रत्येक रेल्वे स्थानकात सरकत्या जिन्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. अपंग त्याचा सर्वाधिक लाभ घेतात. कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांमध्ये मोठय़ा उद्वाहन सेवा प्रवाशांसाठी तैनात आहेत. या रेल्वे स्थानकांमध्ये आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कल्याण, डोंबिवली शहरांसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. डॉ. श्रीकांत शिंदे खासदार, कल्याण लोकसभा सुंदर शहराकडे वाटचाल ‘सुंदर शहर’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात कल्याण-डोंबिवली शहरांचा समावेश व्हावा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कल्याण-डोंबिवली शहरांचा सर्वागीण विकास नजरेसमोर ठेवून या प्रकल्पांतर्गत २८० कोटींचा निधी पालिकेला उपलब्ध करून दिला. या शहरांना प्रथम वाहतूककोंडी मुक्त करणे हे ध्येय समोर ठेवून कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात ‘सॅटिस’ प्रकल्प आकाराला येत आहे. असाच प्रकल्प डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात राबविण्यात येणार आहे. माणकोली उड्डाण पूल, जोशी शाळेजवळील उड्डाण पूल, दुर्गाडीजवळील पुलांची कामे एकाच वेळी सुरू करून शहरातील वाहतुकीचे विभाजन करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कल्याण-डोंबिवली शहराबाहेरून जाणारा ५०० कोटीचा रिंगरूट मार्गी लावण्यात आला आहे. रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी कल्याण, ठाकुर्ली, डोंबिवली या खाडीकिनाऱ्यांचा जलवाहतुकीसाठी कसा उपयोग करता येईल याचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येत आहेत. खाडीकिनारी पर्यटन केंद्र विकसित व्हावे म्हणून दोन कोटींचा निधी पालिकेला शासनाने मंजूर केलाय. शहराच्या वैभवात भर घालणारी उंबर्डे, २७ गाव आणि मोठागाव भागात तीन देखणी शहरे उभारण्याचे प्रस्तावित आहे. टिटवाळा येथे सर्वोपचारी भव्य रुग्णालय, परिचारिका महाविद्यालय प्रस्तावित आहे. डोंबिवलीत सुतिकागृहाच्या उभारणीसाठी सात कोटी निधी शासनाने मंजूर केलाय. रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर या पालिका रुग्णालयांचा सर्वागीण विकास करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहरी गरिबांना ‘झोपु’ योजनेत घरे उपलब्ध करून दिली. ‘पंतप्रधान आवास’ योजनेतून तीन हजार बेघरांना घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिळफाटा रस्त्याचे चौपदरीकरण आणि या रस्त्यावर उन्नत रस्ता बांधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कचऱ्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी घनकचरा प्रकल्प आकाराला येत आहेत. विकासाचे प्रकल्प मार्गी लागावेत म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या शहरावर बारकाईने लक्ष आहे. या सगळ्या विकास प्रकल्पांमुळे येत्या अवधीत कल्याण, डोंबिवली सुंदर आणि परिपूर्ण शहरे म्हणून नावारूपाला येणार आहेत. रवींद्र चव्हाण , राज्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण, आमदार, डोंबिवली विधानसभा विकासाला वेग कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात रस्ते, पाणी, पदपथ, गटारे, नाले, बगीचे, उद्यान, सभागृह विकासाचे एकूण सुमारे ५०० ते ६०० कोटींची कामे प्रस्तावित आहेत. ही सर्व कामे आमदार विकास निधी, कल्याण-डोंबिवली पालिका, ठाणे पालिका, सार्वजनिक बांधकाम, एमएमआरडीए, एमआयडीसी यांच्या माध्यमातून सुरू आहेत. आपला मतदारसंघ हा २७ गाव परिसरात आहे. त्यामुळे या ग्रामीण पट्टय़ातील कामे अधिकाधिक मार्गी लागावीत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे ही नागरी विकासाची कामे करताना एक प्रेरणा आणि गती मिळते. २७ गावांमध्ये अमृत योजनेतून १६९ कोटींची पाणी योजना राबविण्यात येत आहे. ठाणे पालिकेच्या माध्यमातून विकास आराखडय़ातील १० कोटींची रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या भागातील साकव, लहान पुलाची कामे बांधकाम विभागातर्फे सुरू आहेत. काही कामे प्रस्तावित आहेत. ऐरोलीकडून काटईकडे येणारा प्रस्तावित रस्ता, शिळफाटा रस्त्याचे रुंदीकरण ही सगळी कामे आपल्या प्रभागात होणार आहेत. त्यामुळे या विकास कामांना पूरक रस्ते व अन्य नागरी सुविधा तातडीने उपलब्ध व्हाव्यात यादृष्टीने आपण स्वत: प्रयत्नशील आहोत. नाले, गटारांची कामे सुरू आहेत. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाने पाच कोटीचे भव्य सभागृह उभारण्यात येत आहे. कल्याण ग्रामीणमधील प्रत्येक नागरिकाला विकासाची सुविधा मिळावी यासाठी आपण पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. सुभाष भोईर आमदार, कल्याण ग्रामीण अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सुसज्ज शहरे कल्याण-डोंबिवलीचा स्मार्ट सिटी म्हणून विकास करण्याची घोषणा सरकारने केली आहे. त्याअनुषंगाने विकास निधीसुद्धा जाहीर केला आहे. काही प्रकल्प मार्गस्थ आहेत. कल्याण-डोंबिवली रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, नगर परियोजनेंतर्गत (टाऊन प्लॅनिंग स्किम) अत्याधुनिक सुविधांनी युक्त नवीन शहर वसविण्याचा आराखडा असो वा मेट्रो मार्ग व जलमार्गाने मुंबई आणि नवी मुंबईतील शहरं या दोन शहरांना जोडण्याची योजना सुरू असल्याने या दोन्ही शहरांमधून अन्य शहरांमध्ये जाण्याचे मार्ग उपलब्ध होणार असल्याने येथे राहणाऱ्या लोकांसाठी ही नामी संधी आहे. इतकेच नव्हे तर येथील रहिवाशांना नवी मुंबईतील महापे, कोपर- खरणे या परसिरातील कामाच्या ठिकाणी जाण्याचा मार्ग अधिक सुकर होणार आहे. विशेषा म्हणजे कल्याण-डोंबिवली या शहरांना सांस्कृतिक वलय आहे. उत्तम दर्जाचे राहणीमान, सुसज्ज अशा सुख-सोयी आणि दळणवळणाचे अनेक पर्याय यामुळे या भागांमध्ये घर असणे हे एक स्वप्नवत असल्यासारखेच आहे. महेश अगरवाल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, रिजन्सी ग्रुप