सचिन शिंगवी

पुणे नगरपालिकेला १९५० मध्ये महानगरपालिकेचा दर्जा मिळाला. त्यानंतर १९६१ च्या पानशेत पुरामुळे नदीकाठावरील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेनंतर उपनगरांच्या वाढीला चालना दिली. १९८० नंतर पुणे महापालिकेबरोबरच पिंपरी-चिंचवड, पुणे, खडकी आणि देहूरोड या तीन कॅन्टोन्मेंटच्या परिसराचा विकास होत गेला. १९९० च्या दशकात, पुणे माहिती तंत्रज्ञान नगरी म्हणून उदयास आली. पेठांचे शहर, सायकलींचे शहर, विद्योचे माहेरघर, पूर्वेचे ऑक्सफर्ड, माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र अशी बिरूदं मिरवत पुण्याची घोडदौड सुरू झाली.

महानगरपालिकेने ११ सप्टेंबर १९९७ रोजी कात्रज, धनकवडीपासून बाणेर, बावधन ते हडपसर, मांजरी, कळस, धानोरीपर्यंतचा ३८ ग्रामपंचायतचा भाग पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्यात आला. तो करून घेताना महसुली उत्पन्न प्राप्त करून घेण्यासाठी या भागांत झालेल्या बांधकामाचे गुंठेवारी विकास अधिनियम २००१ प्रमाणे गुंठेवारी करून नकाशासह प्रमाणपत्र देण्यात आले. पुण्यातील मध्यमवर्गीयांना परवडेल अशी ३०० ते ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांचे प्रमाण वाढत गेले आणि मध्य पुण्याच्या आजुबाजूचा परिसर विकसित होत गेला.

हेही वाचा >>>मनाला शांतावणारी जागा…

रियल इस्टेट क्षेत्रात २०११ ते २०२० या काळात मोठी क्रांती झाली. मागणी वाढल्याने पुणे शहराच्या आजूबाजूचा भाग विकसित होऊ लागला, पुण्यात व्यवसाय, नोकरी आणि शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढल्याने घरांच्या मागणीला प्रचंड वेग आला आहे. वाड्यांची जागा उत्तुंग इमारतींनी घेतल्याने फ्लॅट संस्कृती आली. पुणे चारही बाजूने अस्ताव्यस्त वाढत गेले आणि फ्लॅटचे दर गगनाला भिडले. ऐतिहासिक, सुरक्षित शहर आणि शहराचे आल्हाददायक वातावरण या जमेच्या बाजू असल्याने सदनिकांच्या विक्रीत विक्रमी वाढ होत गेली. चांगल्या बाजूबरोबर एक काळी बाजूही असते. ग्रामपंचायत भागांमध्ये बेकायदेशीर बांधकामांचे पेव फुटले आणि अनेक लोकांची त्यातून फसवणूक झाली. शासनाने ही फसवणूक गांभीर्याने घेत असंघटित रिअल इस्टेट क्षेत्राच्या नियमनाच्या दिशेने उचलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल होते. रेरा कायदा, स्थावर मालमत्ता नियमक कायदा (रिअल इस्टेट रेग्युलेट्री अॅक्ट) उदयाला आला आणि सर्वसामान्यांच्या होणाऱ्या फसवणुकीला आळा बसला.

पुणे महापालिकेत २३ गावांच्या समावेशामुळे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यात सर्वांत मोठी महानगरपालिका होण्याचा विक्रम पुणे शहराच्या नावावर झाला असून, म्हाळुंगे, सुस, बावधन बुद्रुक, किरकटवाडी, पिसोळी, कोंढवे-धावडे, नवीन कोपरे, नांदेड, खडकवासला, मांजरी बुद्रुक, नऱ्हे, मंतरवाडी, होळकरवाडी, औताडे-हांडेवाडी, शेवडेवाडी, मांजरी बुद्रुक, पीएमसी नांदोशी, मांगडेवाडी, भिलारेवाडी, गुजर निंबाळकरवाडी, जांभुळवाडी असा परिसर पुण्यात समाविष्ट झाला आहे.

हेही वाचा >>>घरात असावे ग्रंथाचे कपाट!

‘अ’ दर्जाचे शहर, मेट्रो सिटी या गोष्टींमुळे पुणे अजून विकसित होणार असून, आजूबाजूच्या ग्रामीण भागातून पुण्यात येणारा वर्ग पुण्याच्या त्या-त्या भागांत घरे घेत आहे. कोल्हापूर, साताऱ्यातून येणारे कात्रज धनकवडी परिसरात, संगमनेर, नगर भागातून येणारे वाघोली, चंदननगर भागात, तर सोलापूरकडून येणारे हडपसर, मांजरी भागात घर खरेदी करत आहेत.

देशाच्या २०११ च्या जनगणनेनुसार, पुणे हे भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले नववे शहर आहे. देशातील सर्वांत मोठ्या आयटी हबपैकी एक अशी पुण्याची ओळख झाली आहे. देशातील ऑटोमोबाइल आणि उत्पादन क्षेत्रात पुण्याने ठसा उमटवला आहे, पुण्याला त्याच्या उच्च प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांमुळे ‘पूर्वेकडील ऑक्सफर्ड’ म्हणून संबोधले जाते. अनेक सर्वेक्षणात ‘भारतातील सर्वांत राहण्यायोग्य शहर’ म्हणून पुण्याचा नावलौकिक झाला आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहर मुळा मुठा नद्या, सह्याद्रीच्या रांगा तसेच छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झाल्यामुळे नेहमीच जगाचे लक्ष वेधत राहील, यात शंका नाही.