गिरगावदादरच्या बालपणात पाऊस तिचा लाडका सखा सोबती होताच, पण तारुण्यात प्रवेश केल्यावर तर तो तिला मोहरूनही टाकायचा. तिला भेटायला घरात पाऊस आलेला तिनं कधी दादरच्या घरात पाहिला नव्हता. फार फार तर घराच्या गॅलरीतून हात बाहेर काढून पडतील ते चार थेंब अत्तरासारखे घ्यायचे.

तिचं अन् पावसाचं नातं अगदी जन्मापासूनचं. श्रावणातला जन्म तिचा. तेव्हाही पाऊस तिला भेटायला आलाच होता. पावसात भिजायचं, नाचायचं आणि त्यात चालता चालता मनमुराद कल्पनांच्या साम्राज्यात फुलपाखरासारखं भिरभिरायचं आणि मग तेच घडायचं. ती खूपच पुढे वेगळ्याच वाटेवर पोहोचली आहे. मग स्वत:ला टपली मारत ती पुन्हा मागे वळायची. अर्थात पावसाला ‘हे असं सगळं तुझ्यामुळेच’ असं ओरडायला विसरायची नाही.

गिरगाव-दादरच्या बालपणात पाऊस तिचा लाडका सखा सोबती होताच, पण तारुण्यात प्रवेश केल्यावर तर तो तिला मोहरूनही टाकायचा. ‘आशीष’बरोबर फिरताना त्याचवेळी त्याने यावे म्हणून ती पावसाची विनवणी करायची. एका छत्रीतून फिरणं ही तिची सर्वात मोठी आनंदाची कल्पना होती. पण तरीही तिला भेटायला घरात पाऊस आलेला तिनं कधी दादरच्या घरात पाहिला नव्हता. फार फार तर घराच्या गॅलरीतून हात बाहेर काढून पडतील ते चार थेंब अत्तरासारखे घ्यायचे. बास्स!

पण लग्न होऊन ती कळव्याच्या घरात आली. तेव्हा तिचं सगळं विश्वच बदलून गेलं. तो म्हणाला होता, ‘कळव्याच्या किल्ल्यात तू सुरक्षित आणि मजेत राहशील.’ पण या किल्ल्यासारख्या घरात लाईट नव्हते, नळ नाहीच. विहिरीचं गढूळ पाणी. तेही रहाटाने ओढून पहिल्या मजल्यावर चढवायचं हंडा- कळश्यांतून. जेवण ७।।-८ लाच उरकून ९ ला झोपाझोप झालेली असे. उठायचं मात्र पहाटे-पहाटे ४।।-५ लाच. मुंबईच्या दिनक्रमापेक्षा हे सगळं अगदीच वेगळं होतं. या लोकांनी लाईट नाही म्हणून थेट सूर्यालाच वेठीला धरलेलं असे. त्याच्या उन्हाचा, प्रकाशाचा पूर्ण वापर होईल असाच हा दिनक्रम होता. घराला भलीथोरली गच्ची होती. रोजचे कपडे वाळवण्यापासून वर्षांची वाळवणं होत. मार्च-एप्रिलमध्ये तर जणू कारखानाच उघडलेला असे. स्वयंपाकघर आणि कोठीच्या खोलीची दारं गच्चीत उघडत. त्यामुळे पापड, कुरडय़ा, पापडय़ा, शेवया, वोटवे करणं, वाळत घालणं, लक्ष ठेवणं सहज सोपं बनायचं. आंबोशी, कोकम सरबत, वाल, मसाल्याची वाळवणं हेही गच्चीतच असे.

संपूर्ण गच्चीच्या कडेनं मोठमोठय़ा कुंडय़ा, रांजण, पिंपातून फुलझाडं लावली होती आणि कुठल्याही अडथळ्याविना येणाऱ्या उन्हा-पावसानं ती सगळी नुसती तरारून उठली होती. सदैव बहरलेली..

गच्चीच्या अगदी टोकाला तिचं आणि आशीषचं छोटंसं विश्व होतं. त्यांची अगदी त्यांचीच अशी खोली. तिला घराच्या आतून सगळ्या खोल्या ओलांडून एक दार होतं. आणि दुसरं दार थेट गच्चीतच उघडत  असे. या गच्चीकडच्या दाराच्या एका बाजूला कृष्णकमळ आणि दुसरीकडून गावठी गुलाबाची वेल होती. त्यामुळे त्या दाराला हिरव्यागर्द रंगाची गच्च पानांची, मध्ये मध्ये गुलाबी आणि जांभळ्या फुलांच्या नक्षीची महिरप झाली होती.

तिच्या बाळाचा जन्मही जुलैचा. पण त्या वर्षी जूनमध्ये पाऊसच नव्हता. सगळी मुंबई धास्तावली होती. तिचा जीवही पावसाविना कासावीस होत होता. त्याचा जन्म झाला आणि जुलैच्या पहिल्या आठवडय़ात पाऊस आला. त्या पावसाकडे ती नुसतीच आसुसून बघत राही. त्याला भेटता येत नाही, स्पर्श करता येत नाही म्हणून खंतावत राही. मग छोटय़ा बाळाला घेऊन ती माहेरहून सासरी कळव्याला आली तेव्हा तर तिला बिनगजांच्या खिडक्या असूनही कैदेत असल्यासारखं वाटत होतं आणि मग ‘तो’ अचानक धो धो बरसत राहिला. मोठय़ा मोठय़ा दमदार सरी. हलकेच दार उघडलं आणि गच्चीत त्या दणकटपणे कोसळणाऱ्या पावसात दोन हात उंचावून ती आनंदाने भिजत राहिली. हा पाऊस तिला अनोळखी होता. कुठल्या तरी रासवट चेहेऱ्याचा होता. छे! ही कैद नव्हतीच. आपल्यालाच ही दार उघडणारी कळ सापडली नव्हती. सगळं गाव गाढ झोपेत होतं. कल्पना करता येणार नाही असा अंधार होता. पण बाळासाठी म्हणून लावलेल्या चिमणीच्या आणि देवघरातल्या समईच्या लांबदार दिसणाऱ्या छोटय़ाशा मंद प्रकाशाचे आश्वासक ठिपके तेव्हढे होते. इतक्यात दारातून आशीष हलक्या आवाजात ओरडलाच, ‘अगं, काय चाललंय काय तुझं? ओली बाळंतीण तू..’ तिने त्यालाही तसंच ओढत गच्चीत आणलं. माझा इथला हा पहिलाच पाऊस! हा अगदी वेगळा आहे. सुरुवातीला महिनाभर पडला नाही त्याची कसर काढतोय. गेल्या वर्षी नोकरीमुळे दिवस सगळा मुंबईत जात होता. घर- संसार, नोकरी, नवी नाती सांभाळायची, त्यामुळे इथल्या पावसाकडे बघायला सवडच नव्हती. तेव्हा मध्यरात्री उठून असा पाऊस मी अनुभवलाच नव्हता. पण यावेळी तर दोन महिने होऊनही मी पावसाचा स्पर्शच अनुभवलेला नाही. त्या असोशीनेच माझी त्याची अशी भेट झाली. हा वेगळाच आहे. रानटी तर आहेच, पण त्यात या सगळ्या फुलांचा-पानांचा सडा पडलेल्या जांभळांचा गंध मिसळलेला आहे.

पण नंतर तिला कळलं इथे पाऊस अगदी घरातही येतो. कौला-कौलांतून अधूनमधून त्याचे थेंब गळायचे. मग ठिकठिकाणी भांडी ठेवावी लागायची. त्याच्या खाली फडकी. कारण थेंब पडल्यावर भोवताली पाणी पसरू नयेत म्हणून. पण या घरात भांडी इतकी आणि वेगवेगळ्या घाटाची होती की पावसाची म्हणून उभी उंच भांडी वेगळी ठेवली होती.

खरं तर हे घरच इतकं वेगळं होतं की सगळी पंचतत्त्व आपणहून आनंदाने घरात यायची. वारा सुसाट येऊन खिडकीची झापं हलवायचा. पण दारं बंद केली तरी वेगवेगळ्या फटींतून उत्साहाने आत घुसायचा. येताना तो धूळ-माती सुकलेली पानंही आणायचा. ऊन-पाऊस तर होताच, पण अख्खं आभाळही असायचं. रात्री गच्चीत खाटेवर पडलं की किनखाणी वस्त्रासारखं दिसायचं. कधी चांदण्यात सगळ्या घरादाराला त्याने कवेत घेतलेलं दिसायचं. आकाशाचा केवळ तुकडा किंवा तुकडय़ा तुकडय़ानं दिसणारं आकाश नव्हतं. पहिल्या मजल्यापेक्षा उंच इमारत अख्ख्या गावात नव्हती. मध्ये कसलाही अडथळा नव्हता. क्षितिजापर्यंत आभाळ दिसायचं. इंद्रधनुष्याचे रंग इतके झगझगीत स्पष्ट इथेच तिला दिसले. सूर्य पूर्ण मावळेपर्यंत त्याची किरणं घरा-दाराशी लगट करीत असत. आभाळाची सगळी रूपंही तिनं याच घरात पाहिली. अगदी त्याच्या नैसर्गिक ढंगात. ढगांनी ओथंबून आलेलं काळंभोर, कधी पांढऱ्याशुभ्र ढगांच्या चित्रविचित्र आकृत्या असलेलं, सकाळ- संध्याकाळ सूर्याच्या येण्या-जाण्यामुळे झालेलं रंगीबेरंगी तर कधी भर दुपारचं तापलेलं शुभ्र! आणि हा मिट्ट काळोखसुद्धा जो मुंबईत कधीच दिसला नव्हता.

झाडं तर खिडकी-खिडकीतून आपल्या फांद्याचे हात आत येऊन झुलवायची. शेवग्याच्या शेंगा ती खिडकीतूनच काढायची आणि वरणात टाकायची. कधीमधी खूप फुलं यायची. तेव्हा खिडकीतूनच काढून पटकन् त्याची परतून भाजी करायची वा थालीपिठं लावायची. गच्चीत जांभळाच्या फांद्यांचा पसारा आलेला असायचा. त्याची जांभळंही ती फांदीवरून तोडून खायची. पाऊस पडला की खाली जांभळांचा सडा पडून जमीन जांभळा साज ल्यायची. खालीसुद्धा तऱ्हेतऱ्हेची फुलझाडं, फळझाडं विहिरीच्या, अंघोळीच्या खोलीच्या आसपास लावली होती. वाडय़ाच्या एका टोकाला बांबूंनी आपली वसाहत तयार केली होती. प्राजक्त, अनंत, सोनसाफा, डाळिंब, तगर, कवठी चाफा, चिकू, फणस, शेवगा, आंबा आणि या सर्व बहराचा उपयोग करून घेतलेली सणावाराची-उत्सवाची भरजरी किनार! ती सुखानं त्या आठवणींनी भरभरून श्वास घेते.

तिच्या सुनांना मोठंच आश्चर्य वाटतं, आई सर्वच बाबतीत मोठय़ाच शिस्तीच्या. पण आपली मुलं पावसात भिजून घरी आली आणि ओल्या कपडय़ात बागडायला लागली की आपला पारा वर चढतो, घरभर ओल होईल म्हणून. ती आजारी पडतील याची काळजीही वाटते. तेव्हा या मात्र मुलांचे हसरे, आनंदाने आणि पाण्याने निथळणारे चेहरे आपल्या पदराने पुसतात. ओलेत्या मुलांना तशाच आपल्या कुशीत घेतात. त्या मुलांचे एखाद्या विजयी वीराप्रमाणे स्वागत करतात. यांची अंगं कोरडी करत असताना मुलांचा आनंद त्या जणू घुटक्या घुटक्यानं पीत असतात आणि मग म्हणतात, ‘आलं नि पाती चहा घालून गरम गरम चहा करा सर्वासाठीच आणि खायलाही करा काही तरी गरमागरम चटकदार..’

आईंच्या या वागण्याचं त्यांना गौडबंगाल वाटतं. कोडं काही सुटत नाही.

तिला कळलं इथे पाऊस अगदी घरातही येतो. कौलाकौलांतून अधूनमधून त्याचे थेंब गळायचे. मग ठिकठिकाणी भांडी ठेवावी लागायची. त्याच्या खाली फडकी. कारण थेंब पडल्यावर भोवताली पाणी पसरू नयेत म्हणून. पण या घरात भांडी इतकी आणि वेगवेगळ्या घाटाची होती की पावसाची म्हणून उभी उंच भांडी वेगळी ठेवली होती.

माहेरहून सासरी कळव्याला आली तेव्हा तर तिला बिनगजांच्या खिडक्या असूनही कैदेत असल्यासारखं वाटत होतं आणि मग तोअचानक धो धो बरसत राहिला. मोठय़ा मोठय़ा दमदार सरी. हलकेच दार उघडलं आणि गच्चीत त्या दणकटपणे कोसळणाऱ्या पावसात दोन हात उंचावून ती आनंदाने भिजत राहिली. हा पाऊस तिला अनोळखी होता. कुठल्या तरी रासवट चेहेऱ्याचा होता. छे! ही कैद नव्हतीच. आपल्यालाच ही दार उघडणारी कळ सापडली नव्हती. सगळं गाव गाढ झोपेत होतं. कल्पना करता येणार नाही असा अंधार होता.

meenagurjar1945@gmail.com